
गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील सहापैकी दोन खडी क्रशर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने केलेल्या तपासणीत दोष आढळल्याने हे क्रशर बंद करण्याचे आदेश उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी दिले आहेत. त्यामुळे क्रशरबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.
हलकर्णी येथे असणाऱ्या या खडी क्रशरमुळे परिसरातील शेती उद्ध्वस्त होत असून, जनावरांच्या चाऱ्याचेदेखील नुकसान होत आहे. ब्लास्टिंगमुळे येथील घरांच्या भिंतीला तडे पडत आहेत. या परिसरातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. या विरोधात शेतकरी राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांपासून शेतकरी संघर्ष करीत होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी जनावरांसह ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन केल्यानंतर तहसीलदारांनी सर्व खडी क्रशर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.
त्यानंतर ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या जनावरांसह हलकर्णी येथील मुख्य चौकात बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, मुक्ती संघर्ष समिती, श्रमिक मुक्ती दल, जनता दल यांनीदेखील पाठबळ दिल्याने आंदोलनाला धार आली होती. यावेळी क्रशर परिसराची संयुक्त स्थळपाहणीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत गट नंबर 405 मधील गुरुसिद्धेश्वर मिनरल्स व गट नंबर 396 मधील मयूर स्टोन क्रशर या दोन खडी क्रशरमध्ये दोष आढळल्याने ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने लढलेल्या लढय़ाला अखेर यश आल्याची प्रतिक्रिया खडी क्रशर विरोधी कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी व्यक्त केली.