युक्रेनचा रशियावर ड्रोन स्ट्राईक, अणुबॉम्ब फेकणारी 41 विमाने नष्ट; ऑपरेशन स्पायडरवेब… 4700 किलोमीटर आत घुसून हल्ला

युक्रेनने आज रशियन लष्कराच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले. हे हल्ले इतके जबरदस्त आणि अचूक होते की त्यात रशियाच्या अणुबॉम्बचा मारा करणाऱ्या तसेच हेरगिरी करणाऱ्या 41 विमानांच्या क्षणार्धात चिंधड्या उडाल्या, असा दावा करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ असे नाव या कारवाईला देण्यात आले. 4700 किलोमीटर आत घुसून हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे रशिया आणि युक्रेनमध्ये पुन्हा युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.

रशियाच्या सायबेरीयातील इर्कुत्स ओब्लास्ट येथील बेलाया हवाई तळ, ओलेन्या हवाईतळ, डयागिलेवो हवाईतळ आणि ल्वानोवो हवाईतळ अशा चार हवाई तळांवर युक्रेनने ड्रोन हल्ले केले. युक्रेनची ही लार्ज स्केल स्पेशल ऑपरेशन मोहीम होती. युक्रेनवर हल्ल्यांसाठी याच हवाई तळांचा वापर रशियाकडून होत होता. त्यामुळे युक्रेन लष्कराच्या ड्रोन्सनी रशियात साडेचार हजार किलोमीटर आत घुसून हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.

रशियाची टीयू-95, टीयू-22 एम 3 आणि ए-50 जातीची विमाने या हल्ल्यामध्ये नष्ट झाल्याचा दावा युक्रेनच्या डोमेस्टीक सिक्युरिटी एजन्सीने केला आहे. त्याचे व्हिडीओही एजन्सीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रशियाने या विमानांचा वापर युक्रेनवर हेरगिरी करण्यासाठी तसेच क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी वापर केल्याचे सांगितले जाते.

दीड वर्षांपासून प्लानिंग

युक्रेन लष्कर गेल्या दीड वर्षापासून ही हल्ल्याची योजना बनवत होते. ट्रकमध्ये बनवण्यात आलेल्या लाकडाच्या विशेष मोबाईल केबिन्समध्ये लपवून ड्रोन रशियामध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर वेळ येताच आज रिमोटद्वारे त्या केबिन्स उघडून ड्रोनने रशियाच्या बॉम्बर्स विमानांना लक्ष्य बनवण्यात आले. या कारवाईला युक्रेनने ‘ऑपरेशन स्पायडरवेब’ असे नाव दिले होते. किमान खर्चात शत्रूचे मोठे नुकसान करणारी ही अचूक योजना होती.

रशियाचे अब्जावधींचे नुकसान

टीयू-95 हे 1950 च्या दशकातील विमान आहे. आजही क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेऊन दूर अंतरावरच्या शहरांना लक्ष्य करण्याची क्षमता या विमानात आहे. ए-50 हे दुर्मिळ व महागडे विमान आहे. हेरगिरीसाठी हे विमान खास वापरले जाते. अशी दहा विमाने रशियाकडे आहेत. टीयू-22 एम 3 हे बॉम्बर विमान ताशी 2300 किलोमीटर वेगाने उडू शकते आणि 24 हजार किलो स्फोटके वाहून नेऊ शकते. या हल्ल्यामुळे रशियाचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.