यूपीत बांके बिहारी कॉरिडोरवरून हंगामा, 500 कोटींच्या प्रकल्पाविरोधात पुजाऱ्यांचा योगी सरकार विरोधात शंखनाद!

वृंदावन येथील श्री बांके बिहारी मंदिर कॉरिडोरच्या प्रस्तावित योजनेला मंदिरातील पुजारी असलेल्या गोस्वामी समाज आणि रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 500 कोटी रुपये खर्चून 5 एकड़ जागेत बांधण्यात येणारा हा दोन मजली कॉरिडोर तीन प्रवेशद्वारांसह तयार होणार आहे. यामुळे दर्शन व्यवस्था सुधारेल आणि गर्दी नियंत्रणात येईल, असा योगी सरकारचा दावा आहे. मात्र गोस्वामी समाजाने या प्रकल्पाला चार मुख्य कारणांमुळे विरोध केला आहे.

यात कॉरिडोरमुळे वृंदावनच्या ऐतिहासिक कुंज गलिया नष्ट होतील, ज्या राधा-कृष्ण लीला आणि सांस्कृतिक वारशाशी जोडल्या आहेत. दुसरे स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांना आपली घरे आणि व्यवसाय गमवावे लागतील, ज्यामुळे त्यांची उपजीविका धोक्यात येईल. तिसरे म्हणजे गोस्वामी समाजाला भीती आहे की, सरकारच्या प्रस्तावित ट्रस्टद्वारे मंदिराचे व्यवस्थापन त्यांच्या हातातून निघून जाईल, जे गेल्या 500 वर्षांपासून ते सांभाळत आहेत. चौथे म्हणजे या योजनेत स्थानिकांच्या भावनांचा आणि मंदिराच्या आध्यात्मिक महत्त्वाचा विचार झालेला नाही.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 5 एकर जमीन संपादित करण्यास परवानगी दिली आहे, ज्यासाठी 500 कोटी रुपये खर्च केले जातील. हे पैसे बांके बिहारी मंदिराच्या तिजोरीतून खर्च केले जातील. मात्र न्यायालयाने अशी अट देखील घातली आहे की, जी जमीन संपादित केली जाईल ती बांके बिहारींच्या नावावर नोंदणीकृत असेल.