
विजय तेंडुलकरांसारख्या ज्येष्ठ नाटककाराकडे चित्रपट लिहिण्यासाठी हट्ट धरणे आणि तेंडुलकरांसारख्या नाटककाराने देखील ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण समजून घेत तो हट्ट पुरवणे आणि त्यातून ‘सामना’सारखा चित्रपट निर्माण होणे, यामागे केवळ तेंडुलकरांच्या दमदार लेखणीचेच यश आहे, असे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि ‘सामना’ चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
सामना’ या चित्रपटास 50 वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात फुटाणे बोलत होते. यावेळी ‘कोहिनूर कट्टा’चा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी माजी पेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, गौरव फुटाणे, सतीश जकातदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ ‘वाळवी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटास प्रदान करण्यात आला. परिसंवादात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे, परेश मोकाशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ समिक्षक दिलीप ठाकूर यांनी केले. रामदास फुटाणे म्हणाले की, मी साधा चित्रकलेचा शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना माझ्या हाताखालून गेलेले विद्यार्थी हे साखर कारखान्याचे राजकारण आणि समाजकारण यशस्वीपणे चालवत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत चिडून मी नोकरी सोडली आणि चित्रपट क्षेत्रात आलो.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, कोणताही चित्रपट यशस्वी होण्यामागे संहितेची आशयघनता हे महत्त्वाचे अंग असते की, जे ‘सामना’ या चित्रपटाला लाभले आहे.
सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात.