
अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृतीनुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का? त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती? असा टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलीनीकरण बाबत जास्त चर्चा झाली.यातून काही लोकांना आनंद झाला. आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवस ही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवार यांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना NDA बरोबर राहण्याची अपरिहार्यता आहे. त्यांच्यावर विविध आरोप झाले आहेत. अशा वेळी शांत झोप लागावी यासाठी भाजपला साथ देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही यातूनच विधान केली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूबाबत देखील विविध शंका उपस्थित केल्या जात असून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला.























































