
ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर भरणाऱ्या मलिक रेहान उरूसातील प्राण्यांच्या कुर्बानीसाठी मुंबई हायकोर्टाने हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेवर सशर्त परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या विशाळगडावर ईद आणि उरूस साजरा केल्यास उधळून लावू, असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, या उरूसावर कायमची बंदी घालावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना हिंदू एकता संघटनेच्या वतीने देण्यात आले. बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई हायकोर्टान विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. याबाबत काही नियम आणि अटी हायकोर्टाने घातल्या आहेत. मात्र, याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
बकरी ईदला अजून दोन दिवस आहेत, सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाच्या विरोधात दाद मागावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडले, असे देखील आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बकरी ईदच्या तोंडावर पुन्हा एकदा विशाळगडचा मुद्दा आक्रमक होत आहे. आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास विशाळगडावरील उरूस उधळून लावू, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला.
14 जुलै रोजी विशाळगडाच्या पायथ्याशी झाली होती दंगल
गतवर्षी 14 जुलै रोजी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी या मोहिमेला हिंसक वळण लागले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुसलमानवाडी या गावात जमावाने केलेल्या तोडफोडीत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. हा अनुभव पाठीशी असताना, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने गडावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. दि. 31 मेपर्यंत विशाळगडावरील बहुतांश अतिक्रमणे काढली आहेत. पण, मुख्य दर्गा असलेल्या ठिकाणी उरूस होऊ नये, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.