
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने पाठिंबा दर्शवला आहे. कडू यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. यानिमित्ताने वर्ध्यातील शेतकऱ्यांनी ‘शेतकरी हक्क मोर्चा’ आयोजित करून सरकारविरोधात निदर्शने केली. यातच आर्वीत बाळा जगताप यांच्या नेतृत्वात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आर्वी तहसील कार्यालयात अंगावरचे कपडे काढत आंदोलन केलं. ‘अंगावरचे कपडे घ्या, पण कर्जमाफी’, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
दरम्यान, बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, दिव्यांगांचे पगार आणि विधवांच्या समस्यांसाठी 17 मागण्या सरकारपुढे ठेवल्या आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्धा येथील मुख्य चौकात जमून शांततापूर्ण निदर्शने केली.