Operation Sindoor – फक्त 23 मिनिटात 9 दहशतवादी तळ भुईसपाट, हिंदुस्थानचा ग्लासही फुटला नाही! – अजित डोवाल

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान, पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर पाकिस्ताननेही पलटवार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतावून लावत पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केले. या कारवाई दरम्यान हिंदुस्थानची काही लढाऊ विमानं कोसळल्याचा दावा करण्यात येत होता. इंडोनेशियातील नौदल अधिकाऱ्यानेही यास दुजोरा दिला होता. तसेच सीडीएस अनिल चौहान यांनीही एक सूचक विधान केले होते. मात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हे सर्व दावे फेटाळून लावत ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानचे काहीच नुकसान झाले नाही असे म्हटले आहे

आयआयटी मद्रास येथे उपस्थितांना संबोधित करताना अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत विदेशी माध्यमांकडून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे म्हटले. मला एक फोटो दाखवा, ज्यात हिंदुस्थानचे नुकसान झाल्याचे दिसतेय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान हिंदुस्थानचे काहीही नुकसान झाले नाही. ग्लासही फुटला नाही, असे डोवाल म्हणाले.

तंत्रज्ञान आणि युद्धाचा संबंध नेहमीच महत्त्वाचा असतो, असे म्हणत अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरचा अभिमान असल्याचेही म्हटले. ऑपरेशन सिंदूरवेळी आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही 9 दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही अचूक निशाणा साधला. आम्ही फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, असे डोवाल म्हणाले.

हिंदुस्थानची काही लढाऊ विमाने पडली! नौदल अधिकाऱ्याने सांगितले ‘ऑपरेशन सिंदूर’चे सत्य

ऑपरेशन सिंदूर फक्त 23 मिनिटांचे होते. मला एक फोटो दाखवा ज्यात हिंदुस्थानचे नुकसान झाले आहे. एक ग्लासही फुटला नाही. विदेशातील माध्यमांनी अनेक खोट्या बातम्या पेरल्या. काही निवडक फोटोंचा आधार घेत पाकिस्तानच्या 13 एअरबेसचे 10 मे आधीचे आणि नंतरचे फोटो प्रसिद्ध केले. यात सरगोझधा, रहीम यार खान, चकलाला, रावळपिंडी यांचाही समावेश आहे. अर्थात आम्ही असे करण्यासही सक्षम आहोत, असे डोवाल म्हणाले.

जेव्हा कसोटी डावाने जिंकतो तेव्हा विकेट किती गेल्या हे महत्त्वाचं नसतं! ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सीडीएस अनिल चौहान यांची फटकेबाजी

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केला होता. या ठिकाणी पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आले होते. त्यानंतर हिंदुस्थानने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान, पीओकेतील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाईलही डागले. मात्र पाकिस्तानचे बहुतांश हल्ले हिंदुस्थानने परतावून लावत पाकिस्तानमधील एअर बेसवर हवाई दलाने हल्ला केला. तत्पूर्वी पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणालीही नष्ट केली. दोन्ही देशातील संघर्ष अण्वस्त्र युद्धाकडे वाटचाल करत असतानाच 10 मे रोजी युद्धविरामाची घोषणा झाली. अर्थात याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतले आणि व्यापाराची भीती दाखवत आपण हे युद्ध थांबवल्याचा त्यांनी अनेकदा दावा केला.

ना श्रेय मिळेल ना नोबेल पारितोषिक; खंत व्यक्त करत हिंदुस्थान- पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार