
बिबट्यांचे मनुष्यांवर हल्ले रोखण्यासाठी 125 बिबट्यांना एकाच ठिकाणी ठेवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच बिबट्यांचे निर्बीजीकरण केले जाईल असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, मानव-बिबट्या संघर्षाबाबत एक बैठक घेण्यात आली. प्रभावित लोकांना 31 ऑक्टोबरपर्यंत मदत पुरविण्यात येईल. बिबट्यांचे निर्बीजकरण (स्टेरिलायझेशन) केले जाईल. सुमारे 125 बिबट्यांना एका ठिकाणी ठेवण्यात येईल आणि काहींना वनविभागाच्या ताब्यात देण्यात येईल. नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील… सध्या बिबटे ऊसाच्या शेतात राहू लागले आहेत, त्यामुळे त्यांचा जंगलाशी संपर्क तुटला आहे. आता ते कुत्रे, मांजरी आणि कोंबड्या पकडतात. या समस्येवर उपाय करण्यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.