
>> बबन लिहिणार
दूध हे खरोखर निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. ते आरोग्यदायी, उपयुक्त आणि पोषणासाठी अत्यावश्यक आहे. आजच्या जागतिक दूध दिनानिमित्त आपण सर्वांनी शुद्ध दूध पिण्याचा आणि आपल्या सहवासात असलेल्या प्रत्येकाला दुधाचे महत्त्व सांगण्याचा केवळ संकल्प केला तरी आपण सर्वांनी ‘जागतिक दूध दिन’ खऱया अर्थाने साजरा केला, असे म्हणता येईल.
दूध हे निसर्गाने मानवाला दिलेले एक अत्यंत उपयुक्त, पौष्टिक आणि जीवनदायी वरदान आहे. ते लहान बाळापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त असून, शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन आहारात दुधाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच दुधाला संपूर्ण ‘आहाराचे प्रतीक’ म्हटले जाते. कारण दुधामध्ये शरीराला आवश्यक असलेले जवळपास सर्व घटक असतात. दूध हे एक पोषक आणि संपूर्ण आहार मानले जाते. ते केवळ शरीरासाठीच नव्हे तर मन आणि आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. दुधात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, जे हाडांना आणि दातांना बळकटी देते. वाढत्या वयात हाडांची वाढ आणि वृद्धावस्थेत हाडांची झीज रोखण्यासाठी दूध खूप उपयुक्त आहे. दूध हे नैसर्गिक, स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारे आरोग्यदायी पेय आहे. रोज एक ते दोन वेळा दूध पिणे ही शरीरासाठी, मनासाठी आणि दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर गोष्ट आहे. देशात सर्वात जास्त वापरले जाणारे दूध म्हणजे गायीचे दूध होय. कारण हे सहज पचन होते आणि पोषणमूल्यांनी भरलेले असते. म्हशीचे दूध हे जाडसर असते. त्यात चरबीचे प्रमाण गायीच्या दुधाच्या तुलनेत जास्त असते. गायी आणि म्हशीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध हे सर्वात भारी असते. हे दूध अनेक आजारांवर उपयोगीसुद्धा पडते. शेळीचे दूध हलके आणि पचायलासुद्धा सोपे असते. परंतु कालांतराने हे दूध कमी मिळत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने शेळीचे दूध कमी झाले आहे. सध्या खेडय़ापाडय़ांमध्ये शेळीचे दूध मिळू शकते. परंतु शहरी भागात हे दूध मिळणे अवघड झाले आहे. कधीकाळी शेळीपालन हे देशातील पारंपरिक व्यवसायांपैकी एक होते. मात्र, अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी शेळीपालनात घट झाली आहे. राज्यात वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे कुरणक्षेत्र कमी झाले आहे. सार्वजनिक जागांवर लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे शेळ्यांना चरण्यासाठी मोकळे रान मिळणे कठीण झाले आहे. शेळीपालनासारखे व्यवसाय अप्रतिष्ठत समजले जात असल्याने आणि शिक्षित तरुणांचे लोंढे आता शहरांकडे स्थलांतरित करू लागल्याने शेळीच्या दुधाचे उत्पादन कमी झालेय.
‘व्हॅलेंटाईन डे’ कधी असतो? असा प्रश्न एखाद्या शेंबड्या पोराला विचारा, तो एका क्षणाचाही विलंब न लावता छातीठोकपणे 14 फेब्रुवारीला असतो, असे सांगेल. तसेच इतके साधे-सोपेही तुम्हाला माहिती नाही का? असे उलट उत्तर देईल. हा प्रश्न विचारल्यानंतर जर त्या पोराला विचारले की, बाळा जागतिक दूध दिन कधी असतो? तर तो मान खाली घालून आजूबाजूला पाहिल्याशिवाय राहणार नाही. तो छातीठोकपणे सांगूच शकणार नाही की, जागतिक दूध दिन हा 1 जून रोजी असतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे समाजात नेहमीच चांगल्या गोष्टी सोडून वाईट गोष्टींचा जास्त उदोउदो केला जातो. त्यामुळेच कीर्तनात बोलताना महाराज नेहमी सांगतात. शरीराला पौष्टिक मिळणाऱया दुधाची विक्री करायला दूध विव्रेत्याला घरोघरी जावे लागते. परंतु दारू विकायला विव्रेत्याला कोणाच्याच घरी जावे लागत नाही. ज्याला दारू प्यायचीय, तो स्वतः दारूचे दुकान शोधून दुकानासमोर रांगा लावून दारू खरेदी करतो. ही खरी तर आजच्या समाजातील वाईट असली तरी खरी परिस्थिती आहे. आपल्या शरीराच्या वाढीसाठी दुधात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असतात. जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. कॅल्शियम आणि पोटॅशियम यासारखे घटक दुधातून आपल्याला मिळत असते. दुधातील घटक हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराची योग्य वाढ व विकास करत असतात, हे सगळे शाळेत शिकवल्यानंतर सुद्धा अनेक जणांना दूध पिणे आवडत नाही. दूध प्यायचे म्हटले की नाक मुरडतात. आरोग्याला घातक समजल्या जाणाऱया 300 मिली कोल्ड्रिंक्ससाठी मात्र 40 ते 50 रुपये मोजायला कोणाला काहीच वाटत नाही. ते मोठय़ा आनंदाने पॅश, फोन पे किंवा गुगल पेने पेमेंट करताना दिसतील. परंतु दुधाचा भाव एक रुपया किंवा दोन रुपयांनी जरी वाढला तरी अनेकांकडून मोठी आदळआपट केली जाते. दूध हे खरोखर निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. ते आरोग्यदायी, उपयुक्त आणि पोषणासाठी अत्यावश्यक आहे. आजच्या जागतिक दूध दिनानिमित्त आपण सर्वांनी शुद्ध दूध पिण्याचा आणि आपल्या सहवासात असलेल्या प्रत्येकाला दुधाचे महत्त्व सांगण्याचा केवळ संकल्प केला तरी आपण सर्वांनी ‘जागतिक दूध दिन’ खऱ्या अर्थाने साजरा केला, असे म्हणता येईल.