
लंडनहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे AI 130 या विमान मुंबई विमानतळावर लँड करायच्या तासभर आधी काही क्रू मेंबर्स बेशुद्ध पडल्याचे समजते.क्रूमेंबर्स बेशुद्ध पडू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र दोन्ही पायलटनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना धीर दिला व विमानाचे सुरक्षित लँडिंग केले.
12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबाद येथे झालेल्या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. तेव्हापासून एअर इंडियाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपत नाही. सोमवारी सकाळी देखील दिल्लीहून एअर इंडियाचं विमान जम्मूला गेलं आणि जम्मूहून लँडिंग न करता दिल्लीत परतलं. जम्मू विमानतळावर नियोजित वेळेवर पोहचल्यानंतर विमानाने आकाशातच काही वेळ घिरट्या घातल्या. यानंतर पायलटने विमान जम्मू विमानतळावर लँडिंग न करता पुन्हा दिल्ली विमानतळावर माघारी आणले.जम्मू विमानतळावरील हवामान लँडिंगसाठी उपयुक्त होते. रनवेही वापरण्यास योग्य होते. यामुळे लँडिंगमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. असे असतानाही पायलटने विमान लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत अद्याप एअरलाईन आणि पायलटकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.