कल्याण बाजार समिती निवडणुकीसाठी 154 अर्ज; आज छाननी, 29 जून रोजी मतदान

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 154 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी अर्जाची छाननी होणार आहे. 18 जागांसाठी 29 जून रोजी निवडणूक होणार असून 2485 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक विशाल जाधवर काम पाहात आहेत.

विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर संचालक मंडळाला दोनदा प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. वाढीव मुदतीचा कालावधी २१ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांच्या आदेशाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी १४ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करून संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

26 मेपासून अर्ज दाखल झाले होते. 30 मे रोजी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. मुदतीअखेर 154 अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जाची छाननी सोमवारी होणार आहे. छाननीनंतर 3 जून रोजी वैध अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 17 जूनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. त्यांनतर 29 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

अशी होईल निवडणूक
18 पैकी 11 जागा सेवा संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आहेत. यामध्ये सर्वसाधारण 7, महिलांसाठी 2, इतर मागासवर्गीय 1, विमुक्त जाती/भटक्या जमातींसाठी 1 जागा राखीव आहे. ग्रामपंचायत गटासाठी 4 जागा असून यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती / जमाती 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी 1 जागा राखीव आहे. व्यापारी व अडते गटासाठी 2 तर हमाल व तोलाई गटासाठी 1 जागा राखीव आहे.