अधिवेशनातून जनतेच्या हाती भोपळा, बळीराजा व लाडक्या बहिणींच्या तोंडाला पाने पुसली; विरोधकांचा घणाघाती आरोप

या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्यातील जनतेच्या हाती फक्त भोपळा लागला आहे. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांच्या आत्महत्या, महागाई, कायदा व सुव्यवस्था अशा विविध मुद्दय़ांवर सरकारला प्रचंड अपयश आले आहे. हे अपयश लपवण्यासाठी महायुती सरकार राज्यात धार्मिक तेढ निर्माण करीत असल्याचा घणाघाती आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे गटनेते भास्कर जाधव, काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर,  सुनील शिंदे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती, पण सरकारने यापैकी कोणत्याही घोषणांची पूर्तता या अधिवेशनात केली नाही. शेतकरी व लाडक्या बहिणींच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. सरकारने या अधिवेशनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण तरीही आम्ही अधिवेशनात सामान्य जनतेचा आवाज उठवला, असे भास्कर जाधव म्हणाले. विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी संख्याबळाची अट नाही; पण तरीही या सरकारने विरोधी पक्षनेत्याची निवड केली नाही, अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाल बगल देण्याचे काम या अधिवेशनात केले आहे. केवळ जातीय तेढ निर्माण आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम या सरकारने केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळाले, तर त्याचे उत्तर शून्य असल्याची टीका यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

z या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण राजीनाम्याची घोषणा सभागृहाच्या बाहेर केली. सभागृहाला माहिती दिली नाही. सरकारने या अधिवेशनात दोन दिवस संविधानावर चर्चा घडवली, पण कामकाजाचे सर्व नियम पायदळी तुडवून संविधानाची पायमल्ली केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.