
>>अनिल दत्तात्रेय साखरे
पालघर जिह्यातील डहाणू येथील श्री महालक्ष्मी मंदिराची यात्रा चैत्र पौर्णिमा 11 एप्रिलपासून सुरू झाली असून 27 एप्रिलपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र, गुजरातमधील महालक्ष्मीचे भाविक खूप मोठय़ा संख्येने येथे यात्राकाळामध्ये हजेरी लावत असतात. महालक्ष्मी मंदिराबाबत एक कथा म्हणजे पुराणकाळात कोल्हापूरची महालक्ष्मी देवी बाहेर दर्शनासाठी निघाली असताना ती डहाणू या आदिवासी क्षेत्रामध्ये आली होती. त्या वेळी खूप संध्याकाळ झाली होती आणि त्या काळामध्येच पांडव आपल्या वनवासाच्या काळात डहाणू परिसरात फिरत होते. भीमाने महालक्ष्मीचे सुंदर, साजिरे-गोजिरे रूप पाहिले व तो महालक्ष्मीवरती मोहित झाला आणि त्याने महालक्ष्मी देवीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, तर या प्रस्तावापासून भीमाला वंचित कसे करावे म्हणून देवीने भीमाला असे सांगितले की, ‘‘एका रात्रीत तू जर येथील सूर्या नदीवरती धरण बांधून पाणी अडवले तर मी तुझ्याशी लग्न करेल.’’ त्याप्रमाणे भीम लगेच आजूबाजूच्या मोठमोठय़ा शिळा, इतर दगड व माती उचलून धरण बांधायच्या कामाला लागला. पहाटेपर्यंत त्याचे धरण पूर्ण व्हायला लागले. ते बघितल्यावरती पुढील धोका ओळखून महालक्ष्मी देवीने काsंबडय़ाचे रूप धारण केले. पहाटेपूर्वीच कुकडूकू असा आवाज दिला. आपले धरण पूर्ण झाले नाही असे समजून भीमाने आपला पराभव स्वीकारला. परंतु तेथे धरणाला शेवटचा एक दगडच ठेवायचा बाकी राहिला होता. निराश झालेल्या भीमाने या मोठय़ा शिळेला आपली पाठ लावली आणि शिळेवर भीमाच्या पाठीच्या आकाराचा ठसा उमटला, जो आजपर्यंत या सूर्या नदीच्या बांधावरती भाविकांना पाहायला मिळतो.
एकेकाळी हे मंदिर अतिशय श्रीमंत होते. 1008मध्ये सुलतान मोहमदाने या मंदिरावर आक्रमण करून येथील सोने व चांदी, जडजवाहिर यांची लुटमार केली. पुढे गजनीच्या मोहमदाने पुन्हा हे मंदिर तोडून येथे मशीद बांधली. मुस्लिम राज्य खालसा झाल्यानंतर येथे पुन्हा नव्याने मंदिर बांधले गेले. राजा तोरडमल यांनी अकबरासह या मंदिराला भेट दिली होती. पंजाब प्रांत स्वतंत्र झाल्यावर राजा रणजितसिंह यांनी मंदिरावर सोन्याचा कळस अर्पण केला होता असे इतिहासावरून दिसून येते.
कालांतराने पुढे जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इ. स. 1306 मध्ये भव्यदिव्य अशा श्री महालक्ष्मी मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून मंदिरामध्ये महालक्ष्मीची सिंदूर विलेपित अशी सुंदर आणि आकर्षक मूर्ती आहे. चैत्र नवरात्रीत मातेला ध्वज अर्पण करण्याची परंपरा आहे. जव्हारचे तत्कालीन राजे मुकणे घराण्याचा ध्वज मातेच्या मंदिरात अर्पण केला जातो. तो ध्वज वाघाडी गावचे पुजारी नारायण सातवा देवीला अर्पण करतात. दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला तर घरात आणि शेतात समृद्धी व भरभराट येते. सर्वपित्री अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते.
डहाणू हे एक सुंदर आणि आकर्षक असे शहर आहे, जे त्याच्या शांत, स्वच्छ, निवांत समुद्रकिनारे, आजूबाजूला पसरलेली हिरवळ वृक्ष वनराजी, मोकळी हवा, हिरव्यागार चिकूच्या बागा आणि पारंपरिक वारली कला यासाठी ओळखले जाते. हे एक असे ठिकाण आहे जिथे निसर्ग, समुद्र, नदी, डोंगररांगा, वेगवेगळे पशुपक्षी आणि पारंपरिक संस्कृती एकमेकांत मिसळतात. ज्यामुळे मुंबईसारख्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात गजबजलेल्या जीवनातून शरीराला व मनाला येथे विश्रांती, उभारी मिळते आणि व्यक्ती ताजीतवानी होते.
डहाणू गाव हे नाव ‘धेणू ग्राम’ या शब्दापासून आले आहे. ज्याचा अर्थ गायींचे गाव असा होतो. डहाणूमध्ये बरीच गुरेढोरे, विशेषतः गायी लोकांच्या मालकीच्या होत्या. आज डहाणू हे पालघर जिह्यातील एक प्रमुख व्यावसायिक आणि औद्योगिक शहर बनले आहे. डहाणू आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खोलवर सागरकिनारा असल्यामुळे येथे देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर प्रस्तावित आहे आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गाशी थेट जोडले जाणार आहे. येथील समुद्रकिनाऱयावर जगभरातील मोठमोठी व्यापारी जहाजे या बंदरावरती येऊ शकतात. त्यामुळे आयात-निर्यात इतर व्यापार उद्दीम वाढून यापुढे डहाणू हे जगाच्या नकाशावर येणार आहे.
निसर्गासोबत पारंपरिक संस्कृती जपून रहिवास करणारे येथील आदिवासी, कोळी, वाडवळ आणि पारशी समाज. 70-80 च्या दशकामध्ये या परिसरामध्ये पूजनीय पांडुरंग शास्त्राr आठवले यांच्या स्वाध्याय परिवारचे वारे वाहू लागले आणि डहाणू आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आध्यात्मिक क्रांतीने खूप मोठा बदल झाला. आज डहाणूच्या सागर किनाऱयावर स्वाध्याय परिवाराचा एक प्रयोग असलेल्या 18 ते 20 मत्स्यगंधा मोठय़ा डौलाने येथील किनाऱयावर डोलत असतात. त्यासोबतच नानासाहेब धर्माधिकारी यांची श्री बैठकसुद्धा या परिसरामध्ये सुरू असून हा परिसर आध्यात्मिक विचार क्रांतीने रंगून गेला आहे.