
सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे झालेली हत्या आजही अनेकांच्या अंगावर काटा आणते. आज उन्हात फिरताना मला त्रास होत आहे, मग त्या वेळी संतोषला किती यातना झाल्या असतील, असे सांगत डोळ्यात पाणी आणून त्यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी, ‘‘जोपर्यंत भावाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण चप्पल घालणार नाही,’’ असा निर्धार केला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सरपंच संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांचे कुटुंबीय पंढरीत आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना चौधरी यांनी, माझ्या भावाची 9 डिसेंबरला हत्या झाली होती, तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे. आज मला चप्पल न घातल्यामुळे खूप त्रास होत आहे, मग संतोषला किती यातना झाल्या असतील, अशी आठवण काढून त्या रडू लागल्या. यामुळे मी विठुरायाला साकडे घातले आहे की, माझ्या भावाला न्याय मिळू दे. यामुळे त्याची मुले किमान चांगले शिक्षण घेतील. संतोषला न्याय मिळाल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, असा निर्धार केल्याचे प्रियंका चौधरी यांनी सांगितले.