मराठा-ओबीसीत दंगली घडविण्यासाठी फडणवीसांनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतले

मराठा आणि ओबीसीत दंगली घडवून आणण्यासाठीच फडणवीसांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले, असा निशाणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर साधला. आंतरवाली सराटी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, तुम्ही किती लायकीचे आहात हे आता मराठे आणि ओबीसींच्या लक्षात आले आहे. यांना ओबीसी समाजाबाबत काही देणे घेणे नाही. मंत्रीपद पाहिजे म्हणून हे बोलतात, जातीयवाद करण्यासाठी त्यांनी मंत्रीपद घेतले, त्यांना किती महत्त्व द्यायचे हे आम्ही ठरवू, असे जरांगे म्हणाले. मराठा आणि ओबीसीत उद्या भुजबळांच्या माध्यमातून दंगली भडकल्या, तर त्याला फडणवीस जबाबदार राहतील, असा इशारा देत मराठय़ांनी यापुढे सावध राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. तुम्ही रडूनपडून फडणवीस यांच्यापुढे नाक घासून मंत्रीपद घेतले. आता वयाच्या हिशेबाने काम करा. तुमची औकात सगळय़ा महाराष्ट्राला माहीत आहे. बाकीच्यांची औकात काढू नका, फडणवीसांनी त्यांच्यावर कंट्रोल ठेवावा. ज्या पक्षाने मोठे केले, त्यांच्या मुंडक्यावर पाय देता आणि औकात काढता? असा सवाल त्यांनी केला. अजितदादांनी यांना मोठे केले; पण अजित पवार यांच्याबाबतही त्यांचे मत चांगले नाही, असे असे जरांगे म्हणाले.