
>> नरेश जाधव
शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम पठारी भागातील खेड्या-पाड्यात दरवर्षी वीज कोसळून मोठ्या प्रमाणात वित्तीय व जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात. मागील पाच वर्षांत या अस्मानी संकटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून वीजरोधक मनोरे उभारण्याची वारंवार मागणी केली जात आहे. मात्र तरीही हे मनोरे कागदावरच राहिले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आदिवासींना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे.
तालुक्यातील खर्डी, दहिगाव, भोसपाडा, शिरोळ, बिरवाडी, अजनुप, धामणी, अघई, वेळुक, वाशाळा तसेच टाकीपठार परिसरातील सावरोली, सोगाव, कानडी, आपटे, खराडे, ढाढरे, डेहणे, नडगाव, खरिवली, किनव्हली या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे 25-30 गावपाड्यांना दरवर्षी चक्रीवादळ, वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. सावरोली, खरपत, नामपाडा, बेलकडी, गांगणवाडी, हिरव्याचीवाडी, झापवाडी, टाकीचीवाडी, उंबरवाडी, रिकामवाडी, फणसवाडी, आंबेखोर, कवट्याचीवाडी येथेही दरवर्षी वीज कोसळून अनेकांचे जीव जातात.
किती बळी गेल्यावर जाग येईल?
गेल्या 5 वर्षांत वीज कोळून 24 नागरिक आणि 50 हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. वीज कोसळून अनेकांचे बळी गेले आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल. याला आळा घालण्यासाठी वीजरोधक मनोरे बसवावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख जानू हिरवा यांनी केली आहे.
तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात एक व किनव्हली परिसरात दोन वीजरोधक मनोरे बसवण्यात यावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे.
परमेश्वर कासुळे, तहसीलदार.