मोदी सरकार देशाची दिशाभूल करतेय, CDS अनिल चौहान यांच्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक

हिंदुस्थानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान यांनी सिंगापूर येथे ब्लूमबर्गशी बोलताना शनिवारी पहिल्यांदा पाकिस्तानच्या दाव्यावर भाष्य केले आहे. यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्रातील मोदी सरकार हे देशाची दिशाभूल करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने तत्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, अशी जोरदार मागणीसुद्धा खरगे यांनी केली आहे.

सिंगापूर दौऱ्यावर असलेल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पहिल्यांदा ब्लूमबर्गला मुलाखत दिली. या मुलाखतीत पाकिस्तानने हिंदुस्थानी जेट पाडले का? असा सवाल ब्लूमबर्गने त्यांना विचारला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, हा खरा मुद्दा नाहीय की किती विमाने पाडली. तर ती विमाने का पडली, हा खरा मुद्दा आहे. अनिल चौहान यांच्या या विधानानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवर एक पोस्ट केली असून, सीडीएसच्या मुलाखतीनंतर काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा त्याचवेळी शक्य आहे. ज्यावेळी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल. केंद्र सरकार देशातील जनतेची दिशाभूल करत आहे. आमचे हवाई दलाचे पायलट शत्रूशी लढताना आपला जीव धोक्यात घालत होते. आपल्याला काही नुकसान झाले आहे. परंतु, पायलट सुरक्षित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध टाळले असेल तर ते शिमला कराराचे सरळसरळ उल्लंघन आहे, असा आरोपही खरगे यांनी केला आहे.

मोदी निवडणुकीत व्यस्त

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील युद्ध टाळल्याचा दावा केला जात आहे. हा दावा खोटा आहे, असे सांगण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीत व्यस्त आहेत. ते निवडणुकीत आमच्या सशस्त्र दलांच्या विजयाचे वैयक्तिक श्रेय घेत आहेत. जवानांच्या साहसांच्या मागे लपत आहेत. युद्धबंदी नेमकी कशामुळे झाली, हे सांगण्याऐवजी ते लोकांना भ्रमित करत आहेत. युद्धविराम नेमका कोणत्या अटींवर करण्यात आला आहे, हे जाणून घेण्याचा हक्क देशातील 140 कोटी लोकांना आहे, असे खरगे म्हणाले.

आमची विमाने पडली कशी? हे महत्त्वाचे! सीडीएस अनिल चौहान यांच्या विधानाने खळबळ