दोनच भाषा शिकविण्याचा अध्यादेश काढा, अन्यथा आंदोलन; राज ठाकरे यांचा सरकारला इशारा

एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा सरकारचा डाव जोरदार विरोधामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र पहिलीपासून फक्त मराठी आणि इंग्रजी भाषा शिकवण्याबाबतचा अध्यादेश अद्याप काढण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने लेखी घोषणेचा अध्यादेश काढावा, अशी मागणी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी भाषा शिकवल्या जात असताना हिंदीची सक्ती कशासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुळात हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. असे असताना ‘हिंदी’च्या निर्णयाचा फायदा घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तकांची छपाई सुरू आहे. त्यामुळे आता सरकार पुन्हा आपल्या घोषणेविरोधात काम करीत असल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला आहे.