
रत्नागिरी शहरातील पांढरा समुद्र येथील पाण्याच्या टाकी जवळ संशयास्पदरित्या वावरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचा 716 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
पोलिसांनी आरोपी रोहित राजेंद्र चव्हाण (वय 35) याला ताब्यात घेतले आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 14 लहान आणि तीन मोठ्या प्लास्टिक पारदर्शक पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये 716 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर, श्याम आरमाळकर, दीपक साळवी, अरूण चाळके, अमोल भोसले, आशिष भालेकर पकंज पडेलकर आणि अमित पालवे यांनी कारवाई केली.
बैलांना कत्तलीसाठी नेत असलेला टेम्पो पोलिसांनी पकडला, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची कारवाई
खानू येथे पाच बैलांची वाहतूक करताना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एक टेम्पो पकडला. वाहतूक करणाऱ्यांकडे चौकशी केली असता बैल खरेदी केल्याची पावती आणि वैद्यकीय तपासणी केलेली नव्हती. बैलांसाठी कोणतेही खाद्य किंवा पाण्याची व्यवस्था न करता बैलांना त्रास होईल, अशा पद्धतीने बांधून बैल कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भात गुन्ह्यांना प्रतिबंध बसून कारवाई व्हावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. गुरूवारी (05 जून 2025) मध्यरात्री 11 वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस खानू येथे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी एक टेम्पो पकडला त्यामध्ये पाच बैल बांधलेले आढळताच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आरोपी राहूल आनंदा सावंत (वय 23) आणि ऋषिकेश आनंदा सावंत (वय 26) या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी 6 लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त केला आहे. तसेच पाच बैलांची सुटका केली आहे. ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांच्या पथकाने केली आहे.