
बॉलीवूडमध्ये सध्या आठ तास काम करण्याचा मुद्दा हा कळीचा ठरत आहे. मुख्य म्हणजे आठ तासांच्या मुद्दय़ावरून आता इंडस्ट्रीमध्येच विविध मतमतांतरे दिसून येत आहेत. त्यामुळेच आता बहुसंख्य निर्माते एकत्र येऊनच या मुद्दय़ावर तोडगा काढण्याच्या विचारात आहेत.
आठ तास कामाच्या मुद्दय़ावरून दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संदीपा वांगा रेड्डी यांच्यात जोरदार खटके उडाले. या वादाची परिणती म्हणून दीपिकाला काही दिवसांपूर्वी ‘स्पिरीट’ या चित्रपटातून डच्चू देण्यात आला होता. ‘स्पिरीट’चा वाद अगदी ताजा असतानाच दीपिकाने पुन्हा एकदा ‘कल्की-2’ या चित्रपटासाठीही आठ तास कामाच्या वेळेची मागणी केल्यामुळे एकापाठोपाठ दुसऱ्या चित्रपटातूनही तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
एखाद्या चित्रपटाचे शूटिंग म्हटल्यावर केवळ एका कलाकाराची वेळ सांभाळून चालत नाही, तर त्यासाठी सर्व कलाकारांच्या वेळा सांभाळाव्या लागतात असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता सध्या आघाडीचे निर्माते, कलाकारांसोबत करण्यात येणाऱ्या करारामध्येच बदल करण्याच्या विचारात असल्याचे खात्रीशीर वृत्त दै. ‘सामना’च्या हाती आले आहे. हे बदल धोरणात्मक बदल असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये एका दिवसात किती सीन शूट होणार इथपासून ते इतर अनेक गोष्टींवर कोणत्या मर्यादा असतील असे सर्व मुद्दे करारामध्ये आता नमूद करण्यात येणार आहेत.
‘स्पिरीट’ आणि ‘कल्की-2’ हे दोन्ही चित्रपट बिग बजेट असल्याने या चित्रपटांतील दीपिकाच्या हकालपट्टीची बॉलीवूडसह इतर अनेक माध्यमांमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे. दीपिकासारख्या ख्यातनाम अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक आता सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.
आठ तास कामाच्या वेळेवरून आता बॉलीवूडसह टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि वेबसीरिजच्या सेटवरील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एकीकडे आठ तासांची कामाची वेळ आणि दुसरीकडे मोठय़ा कलाकारांचे नखरे यामुळे निर्मात्यांसह दिग्दर्शकही चांगलेच हवालदिल झाले आहेत.
ख्यातनाम दिग्दर्शकाने नाव न सांगण्याच्या अटीवरून, कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा मोठे कलाकार हे शिफ्टला ठरलेल्या वेळेत येत नाहीत. शिवाय काही कलाकार व्हॅनिटी व्हॅनमध्येच तीन ते चार तास बसून राहतात, बाहेरच येत नाहीत. असे असताना आठ तासांच्या कामाची वेळ कशी देता येईल? असा प्रश्न आता दिग्दर्शकांना आणि प्रोडक्शन हाऊस या दोघांनाही पडलेला आहे.
आगामी काळात निर्मात्यांकडून करारात बदल करणार येणार असल्यामुळे बॉलीवूडमध्ये नव्याने येणाऱ्या कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.