गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, दहशतवादाविरुद्ध मध्य आशियाई देश एकवटले

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी तीव्र निषेध केला. दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार, सूत्रधार आणि त्यांना आर्थिक मदत पुरवणाऱ्यांना यासाठी जबाबदार धरले पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली तरच पीडितांना न्याय मिळेल, अशी भूमिका मध्य आशियाई देशांनी मांडली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच हिंदुस्थान-मध्य आशिया परराष्ट्रमंत्र्यांच्या संवादाचे आयोजन केले होते. यावेळी दहशतवादाविरुद्ध मध्य आशियाई देश एकवटले.

साडेतीन वर्षांहून अधिक काळानंतर झालेल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीतून दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला कडक संदेश देण्यात आला. संयुक्त निवेदनानुसार, मध्य आशियाई देशांनी हल्ल्यांचा निषेध करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, सीमेपलीकडून दहशतवादी संघटनांचा वापर करणे, दहशतवादाला निधी देणे, अमली पदार्थांची तस्करी करणे, कट्टरपंथी विचारसरणी पसरवणे हे मानवतेच्या आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचे नमूद केले. दरम्यान, दहशतवाद, युद्ध आणि ड्रग्जपासून मुक्त आणि स्थिर अफगाणिस्तानसाठी सर्व मंत्र्यांनी आपापल्या देशाचा पाठिंबा जाहीर केला. अफगाणिस्तानशी संबंधित बाबींवर जवळून समन्वय आणि सल्लामसलत सुरू ठेवण्यावर सर्व परराष्ट्रमंत्र्यांनी सहमती दर्शवली.

हिंदुस्थानने मानले आभार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने मध्य आशियाई देशांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यासाठी हिंदुस्थान एक विश्वसनीय भागीदार असेल. आम्ही व्यापार, पर्यटन आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांत या पाच देशांसोबत सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहोत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.