कल्याणमध्ये शिवसैनिकांचा घंटानाद; दुर्गाडीच्या पायथ्याशी जोरदार आंदोलन

बकरी ईदचे निमित्त सांगून ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी जाण्यास पोलिसांनी हिंदूंना विरोध केल्याच्या निषेधार्थ आज किल्ल्याच्या पायथ्याशी शेकडो शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केले. तसेच पोलिसांच्या दडपशाहीचा निषेधही केला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांना अटक करण्यात आली. दुर्गाडीवर आधी हिंदूंचा हक्क असून कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यास हिंदूंना मज्जाव करण्यात येतो. त्याविरोधात 1986 पासून शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याकडे कूच केली. मात्र पोलिसांनी लाल चौकीतील गणेश मंदिराजवळच शिवसैनिकांना अडवले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

या आंदोलनात शिवसेनेचे उपनेते विजय साळवी, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, भिवंडी संपर्कप्रमुख साईनाथ तारे, महिला जिल्हा संघटक रेखा कणटे, कल्याण शहरप्रमुख बाळा परब, शरद पाटील, नारायण पाटील, दत्ता खंडागळे, जगदीश तारे, जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, युवासेनेचे गणेश नाईक, किशोर शुक्ला, सतीश वायचळ, वंडार कारभारी, राजू दीक्षित, राजा महाले, सचिन सोस्टे, अरुण बागवे, समीर काळे, सुनिता लेखावळे, मीना कांबळे, सुजाता धारगळकर, मथुरा परदेशी, सुवर्णा पवार, भागवत बेसाने आदी शिवसैनिक सहभागी झाले.

हिंदूंना न्याय का मिळवून दिला नाही
सध्याचे राज्यात असलेले सरकार हे हिंदुत्ववादी नव्हे तर बेगडी सरकार आहे. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री झालात तरीही हिंदूंना न्याय का मिळवून दिला नाही, असा थेट सवाल शिवसेना उपनेते विजय साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.