
मणिपुरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर राज्यात हिंसाचार भडकला आहे. यामुळे इम्फालसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर बिष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. इम्फाल पूर्व, इम्फाल पश्चिम, थौबल आणि काकचिंग या जिल्ह्यांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
शनिवारी रात्री मैतेई समुदायाच्या अरामबाई तेंगोल या संघटनेच्या एका नेत्याला अटक करण्यात आली. या अटकेनंतर इम्फालसह अनेक भागांमध्ये तीव्र निदर्शने सुरू झाली. संतप्त जमावाने रस्त्यांवर टायर आणि फर्निचर पेटवून दिले. काही आंदोलकांनी स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली, तर काहींनी प्रत्यक्षात असे प्रयत्नही केले. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात एका व्यक्तीचा लाठीचार्जमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विशेषतः राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्याला गुवाहाटी येथे नेण्यात आले आहे.
दरम्यान, या हिंसाचारामुळे मणिपुरमधील तणाव आणखी वाढला आहे. आंदोलकांचा रोष आणि सुरक्षा दलांचा प्रतिसाद यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती आहे. प्रशासनाकडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.