सामना अग्रलेख – रामसभेचे पावित्र्य!

अयोध्येत जो राम दरबार सजला आहे, त्यास दरबार म्हणणे हिंदू धर्म व संस्कृतीनुसार योग्य आहे काय? ‘दरबार’ हे मोगल राजा, बादशहांचे भरत असत. प्रभू श्रीराम त्याआधीचे अवतार पुरुष आहेत. त्यामुळे भगवान श्रीराम दरबार नाही. ती फार तर ‘रामसभा’, ‘राम बैठक’ असू शकेल. दरबारात राजकारण, व्यवहार, न्यायनिवाडा होतो. रामसभेला पावित्र्य आहे. ते अयोध्या नगरीत टिकवायला हवे. रामराज्य आणि रामसभा यांची सांगड घालायला हवी. देशात रामराज्य उरलेले नाही. श्रीराम हे सत्यवचनी, एकवचनी होते. ते सत्य आजच्या राजवटीत रोज पराभूत होताना दिसते. ते पाहून श्रीरामही रामसभेत अस्वस्थ होत आहेत. असत्य मार्गाचा अवलंब करून जे लोक भारताच्या सत्तेवर विराजमान झाले, त्यांना रामसभेचे महत्त्व आणि पावित्र्य कधीच समजणार नाही.

अयोध्येतील राममंदिराच्या पहिल्या मजल्यावर भव्य राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. गुरुवारी हा धर्म सोहळा पार पडला. याचबरोबर रामजन्मभूमी परिसरात नव्याने उभारलेल्या आठ मंदिरांतही मूर्तींची स्थापना झाली. 22 जानेवारी 2024 रोजी राममंदिरात श्रीरामांची प्रतिष्ठापना झाली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी जगभरातून बड्या पाहुण्यांना भाजपने आमंत्रित केले. राममंदिराचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा हा एक राष्ट्रीय सोहळा म्हणून आयोजित व्हायला हरकत नव्हती, पण भारतीय जनता पक्षाने याचे खासगी राजकीय सोहळ्यात रूपांतर करून पावित्र्य घालविले. 22 जानेवारी 2024 च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता राम दरबाराचे सगळ्यात मोठे आयोजन झाले. या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मोदी पुन्हा अयोध्येत फिरकलेलेच नाहीत. कारण ज्या श्रीरामांच्या नावाने मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उतरले, त्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तर प्रदेशात श्रीरामांनी मोदींना रोखले. मोदी यांनी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला होता, पण मोदींनी लोकसभेतले बहुमत गमावले. भाजप 240 वरच रखडला. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मोदी यांनी कसेबसे कुबड्यांवरचे सरकार बनवले. ते इतरांच्या मेहेरबानीवर चालले आहे. त्यामुळे मोदी हे श्रीरामांचे बोट पकडून त्यांना अयोध्येत घेऊन आले (असे त्यांचे भक्त सांगतात) त्या श्रीरामांनीच अयोध्येच्या पवित्र भूमीवर

मोदींचे बोट सोडले

व भाजपची नाव शरयू नदीत हेलकावे खाऊ लागली. श्रीरामांच्या मंदिराचा उद्घाटन उत्सव हा काही हिंदुत्वाचा आणि प्रचाराचा मुद्दा होऊ शकला नाही. त्यामुळे राम दरबाराचा उत्सव या वेळी थोडक्यात व नेटका साजरा केला गेला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. या वेळी सर्वत्र वेदमंत्रांचा मंगलमय घोष सुरू होता. मंत्रनाद, शंखध्वनी, मंत्र पठण, होमहवन यामुळे अयोध्या परिसराचे वातावरण हे जणू श्रीराम अयोध्येत वावरत आहेत अशाच प्रकारचे झाले. राम दरबार उत्तम रीत्या वैभवाने सजला आहे. राम दरबारासाठी हिरे, सोने, चांदीचे दागिने सुरतचे रामभक्त व्यापारी मुकेश पटेल यांनी दान केले. या दागिन्यांत काय आहे? एक हजार कॅरेटचा हिरा, 30 किलोची चांदी, 300 ग्रॅम सोने, 300 कॅरेट माणकांपासून बनवलेले 11 मुकुट आहेत. शिवाय प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्यासाठी हार, कर्णफुले, कपाळावर सुवर्णतिलक, धनुष्य आणि बाण आहेत. हा भव्य राम दरबार त्यामुळे देखणा, तेजस्वी आणि वैभवशाली बनला आहे. हे सर्व घडत असले तरी राममंदिराचे निर्माण कार्य अद्याप संपलेले नाही. दर्शनासाठी भाविक येतात, त्यांच्यावर बंधने आहेत. दीपोत्सवानंतर मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे खुले होईल. राम दरबार हे एक भव्य आकर्षण ठरेल. राम दरबारात भगवान राम धनुष्यासह सिंहासनावर विराजमान आहेत. सोबत माता सीतादेखील आहेत. डाव्या बाजूला हनुमान आणि उजव्या बाजूला भरत वीरासन घालून बसले आहेत. मागे श्री लक्ष्मण आणि शत्रुघ्न ऐटीत उभे आहेत. मंदिराच्या

गर्भगृहातील भिंतींवर

भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती कोरल्या आहेत. हा सर्व राम दरबाराचा भाग आहे. राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा अभिजित मुहूर्तावर करण्यात आली. राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गंगा दशहराच्या दिनी 17 मिनिटांचा खास अभिजित मुहूर्त निवडला. याचे कारण म्हणजे अशी मान्यता आहे की, भगवान श्रीरामांचा जन्म अभिजित मुहूर्तावरच झाला. त्यामुळे राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा त्याच मुहूर्तावर करण्यात आली. हे झाले राम दरबाराचे धार्मिक आणि वैदिक विश्लेषण. पण अयोध्येत जो राम दरबार सजला आहे, त्यास दरबार म्हणणे हिंदू धर्म व संस्कृतीनुसार योग्य आहे काय? ‘दरबार’ हे मोगल राजा, बादशहांचे भरत असत. प्रभू श्रीराम त्याआधीचे अवतार पुरुष आहेत. मोगलांचा दरबार हा पाच-सहाशे वर्षांपूर्वीचा. त्यामुळे भगवान श्रीराम दरबार नाही. ती फार तर ‘रामसभा’, ‘राम बैठक’ असू शकेल. रामसभेत सगळेच श्रीरामांचे कुटुंब विराजमान आहे व ते आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहे. दरबारात राजकारण, व्यवहार, न्यायनिवाडा होतो. रामसभेला पावित्र्य आहे. ते अयोध्या नगरीत टिकवायला हवे. रामराज्य आणि रामसभा यांची सांगड घालायला हवी. देशात रामराज्य उरलेले नाही. श्रीराम हे सत्यवचनी, एकवचनी होते. ते सत्य आजच्या राजवटीत रोज पराभूत होताना दिसते. ते पाहून श्रीरामही रामसभेत अस्वस्थ होत आहेत. असत्य मार्गाचा अवलंब करून जे लोक भारताच्या सत्तेवर विराजमान झाले, त्यांना रामसभेचे महत्त्व आणि पावित्र्य कधीच समजणार नाही.