
बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक पक्षाने पंबर कसली आहे. यादरम्यान बिहारमधील भाजप नेते, यूटय़ूबर मनीष कश्यप यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये मी स्वतःचे रक्षण करू शकत नाही, इतरांना मदत कशी करू शकतो, अशी भावनिक पोस्ट फेसबुकवर टाकत त्यांनी राजीनामा दिला. मला भाजप सोडण्यासाठी भाग पाडल्याचे त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी भाजप नेते मनोज तिवारी व अनिल बलुनी यांच्या उपस्थितीत कश्यप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
काही दिवसांपूर्वी तामीळनाडूमध्ये बिहारमधील कामगारांची पिळवणूक केली जाते, त्यांना त्रास दिल्याचा व्हिडिओ टाकल्याने कश्यप चर्चेत आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलीन व मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या वादावर पडदा टाकला होता. मनीष कश्यप यांना भाजपच्या लोकांकडून त्रास दिल्याचे प्रकार समोर येत होते. भाजपमध्ये ते अस्वस्थ व नाराज असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर पटना मेडिकल कॉलेजमध्ये काही डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना समोर आली.