नगर तालुक्यातील दक्षिण भागातील ढगफुटीसदृश पावसामुळे हजारो कुक्कुटपक्षी मृत्युमुखी; घरे, गोठ्यांची पडझड, नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त

प्रातिनिधिक फोटो

नगर तालुक्यातील दक्षिण भागात 27 मे रोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाच्या नुकसानीची आकडेवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यात वेगवेगळ्या गावांमध्ये हजारो कुक्कुटपक्षी मृत पावले असून, घरांसह जनावरांचे गोठे आणि पशुधनाचे 40 लाख 73 हजार 509 रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नुकसानीच्या या आकडेवारीत कृषी विभागाच्या अहवालाचा समावेश नाही. तो अंतिम झाल्यावर नुकसानीचा आकडा वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

नगर तालुक्यातील दक्षिण भागात 27 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वालंबा नदीला पूर आला होता. या पुरामुळे तालुक्यातील खडकी आणि वाळकी या गावांना पुराचा वेढा पडला तसेच अनेक गावांचा काही वेळ संपर्क तुटला होता. या ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदा नगर-दौंड मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. खडकी गावातील पाच ते सहाजण पुराच्या पाण्याच्या वेढ्यात अडकून पडले होते. या ठिकाणी ट्रॅक्टरसह ट्रॉली वाहून गेली होती. पोलीस आणि लष्कराच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अनेकांचे प्राण वाचवण्यात आले होते. मात्र, पशुधन वाचवण्यात अपयश आले होते. दरम्यान, या गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका प्रशासनाला देण्यात आले होते.

सुमारे आठ ते दहा दिवसानंतर तालुका प्रशासनाला झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार करता आला आहे. यात ढगफुटीसदृश पावसामुळे 41 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका प्रशासनाला आहे. या पावसात 55 मोठी दुधाळ जनावरे, 205 लहान दुधाळ जनावरे, पाच ओढकाम करणारे मोठे पशुधन, 1 लहान ओढकाम करणारे पशुधन, 1,170 कुक्कुटपक्षी मृत पावले असून, 192 घरांसह 42 जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असल्याची पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या नुकसानीच्या आकडेवारीत नगर तालुक्यातील दक्षिण भागातील शेती पिकांच्या नुकसानीचा समावेश नाही. याबाबत कृषी विभागाकडून सविस्तर अहवाल आल्यावर अंतिम नुकसानीचा आकडा समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.

पुढील आठवड्यात अंतिम अहवाल
अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व तालुक्यांतील कृषी आणि महसूलची एकत्रित आकडेवारी पुढील आठवड्यात उपलब्ध होणार आहे. सध्या अनेक ठिकाणी पंचनामे सुरू असून, ते अंतिम झालेले नाहीत. ही आकडेवारी एकत्रित झाल्यावर जिल्ह्यात यंदा अवकाळीत किती नुकसान झाले, याची अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे.

दोघा मृतांच्या वारसदारांना 8 लाख
27 मे रोजी झालेल्या पावसात नगर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला असून, यातील एक नगर शहरातील आहे. या मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख याप्रमाणे आठ लाखांची आर्थिक मदत देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.