
पावसाळा आल्याने राष्ट्रीय रस्ते विभाग, महामार्ग पोलीस आता कामाला लागले आहेत. मुसळधार पावसात महामार्गांवर दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता निसरडा होणे, खड्डे पडणे या समस्या हमखास उद्भवतात. परिणामी अपघाताच्या घटना घडून नाहक जीव जातात, अनेकांवर गंभीर जखमी होण्याचे संकट कोसळते. त्यामुळे या समस्यांना रोखण्याचे आव्हान नेहमीप्रमाणे आता संबंधित यंत्रणांपुढे असणार आहे. त्याचबरोबर चालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
सात ठिकाणी 30 ब्लॅक स्पॉट
मुंबई-गोवा व मुंबई-पुणे महामार्गावरील मिळून सात ठिकाणी एकूण 30 ब्लॅकस्पॉट आहेत. पळस्पे येथे माडप बोगदा ते लोधिवली ब्रीज, रिसवाडी, कलोते, लोधिवली, तरणखोप, रामवाडी, वाशीफाटा. बोरघाट- ढेकूण गाव ते पुणे-मुंबई लेनवर, आडोशी गाव, अॅन्डा पॉईंट, खोपोली एक्झिट. वाकण – गडबड, डोलवी, पुरी, सुकेळी खिंड. महाड – रेपोली, लोणेरे, तळेगाव पेट्रोल पंप दोन्ही बाजू, टेमपाले-लाखपाले-पहाले, वीर, तासगाव, मुगवली, आशेने, लोहारे. कशेडी – धामणदेवी, चोळीई, भोस्तेघाट. हातखंबा – हातखंडा गाव, दाभोळे. कसाल – जान्हवी हॉटेल ते निलम कंट्री साईड हॉटेल. हे ब्लॅक स्पॉट असून इथे विशेष खबरदारी घेण्याची चालकांना आवश्यकता आहे.
सूचना व उपाययोजना
- महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनासाठी अॅम्ब्युलन्स, जेसीबी, हायड्रा व्रेन, पुरेसे कर्मचारी वर्ग इत्यादींची व्यवस्था 24 तास उपलब्ध असावी.
- आवश्यक त्या ठिकाणी साईडपट्टी, पॅट आईज, पॅनकॉर मिरर, वेग मर्यादा दर्शविणारे फलक तसेच वाहतूक वळविलेल्या ठिकाणी डायव्हर्जनचे बोर्ड लावावेत.
- ब्लॉक स्पॉट/अपघातांच्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. ऑईल गळतीवर उपाययोजना म्हणून डस्ट ठेवावे.
- ज्या ठिकाणी पुलांची कामे अपूर्ण आहेत, ती पावसाळय़ापूर्वी होणे शक्य नसल्यास सर्व्हिस रोड व्यवस्थित करून घ्यावेत.
- पूल, नद्यांचे पूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. तसेच महामार्गालगत असलेल्या नाल्यांची सफाई करून घ्यावी.
- महामार्गावरील वाळलेली झाडे तसेच वाढलेल्या झाडांच्या फांद्याची कटिंग करून घ्यावी.
महामार्गावर ज्या ठिकाणी पाणी साचून राहते, तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच पाणी साचल्याने महामार्ग बंद झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी यांचा पुरवावी अशा सूचना या बैठकीत संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तेव्हा खरंच या सूचनांचे पालन होणार का, प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार का हे पाहावे लागेल असे चाकरमान्यांचे म्हणणे आहे.