
।। दिव्या नेरुरकर–सौदागर
चालढकल हा विषय मांडताना मी ‘व्यक्तीच्या या सवयीवर अतिविचारांचा पगडा असतो आणि शेवटी शेवटी काम संपवताना ते अक्षरश घाईगडबडीत उरकतात’ असं नमूद केलं होतं. पण चालढकलीमध्ये कधीकधी पूर्व कटू अनुभवांचाही पगडा असू शकतो हे कार्तिकच्या उदाहरणाद्वारे आजच्या लेखातून मला सांगायचे आहे.
नताशाने तिच्या नवऱयासाठी, कार्तिकसाठी (दोघांची नावे बदलली आहेत) वेळ घेतली होती. ठरल्यावेळी दुसऱया दिवशी दोघेही नवरा-बायको हजर झाले. “या वेळेला तर कार्तिकला शपथ घालून आणलंय मी.’’ केबिनमध्ये शिरतानाच नताशाने स्वतची बाजू मांडली. “हा आजसुद्धा टंगळमंगळ करत होता, पण आला. त्यासाठी थोडी बाचाबाची…’’ तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच कार्तिक ओरडला, “थोडी बाचाबाची? प्लीज मॅम, कालपासून अबोला होता हिचा आणि आज सकाळपासून धुसफूस. सारखी कानामागे भुणभुण लावत होती. शेवटी झालं भांडण, पण आलो ना.’’ साधारण चाळीशीत पोहोचलेला कार्तिक अगदी लहान मुलासारखा नताशाची तक्रार मांडत होता.
ही दोघे नवरा-बायको समुपदेशन सत्राला जवळपास एक वर्ष येत होती, पण त्यामध्ये सलगता नव्हती. दोघांचाही स्वभाव मनमोकळा असल्याने त्यांनी समुपदेशन प्रक्रियेला ‘त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक’ म्हणून स्वीकारले होते. तसेच दोघांनीही ‘मानसिक स्वास्थ्याला’ महत्त्वाचे स्थान दिले असल्याने त्याबाबतीत दोघेही सजग होते. त्यात कार्तिकची एक समस्या होती, ज्यामुळे दोघांनी ही प्रक्रिया सुरू केली होती. ती समस्या होती, कार्तिकची चालढकल वृत्ती. तो प्रत्येक कामात चालढकल करायचा. घरचा मेंटेनन्स असो, कुठलेही बिल असो किंवा मार्केटमधून कुठली वस्तू आणायची असो, कार्तिकची चालढकल ही ठरलेली होती.
कार्तिकच्या या सवयीला नताशा सरावलेली होती. त्यामुळे घरातल्या गोष्टींबाबत ती त्याच्यावर अवलंबून राहात नव्हती. पण त्या दिवशी त्याने हद्द केली. नताशाला अस्थमाचा त्रास होता. म्हणून ती पंप नेहमी जवळ बाळगत असे. त्या दिवशी दोघेही एका लग्नाला जाणार होते. नताशा ऑफिसमधून थेट लग्नाला पोहोचणार असल्याने तिने छोटी पर्स घेतली होती. घाईगडबडीत ती अस्थमाचा पंप त्यात घालायला विसरली. कार्तिक घरूनच काम करत असल्याने तो तिला ऑफिसवरून पिक अप करणार होता. ऑफिसमध्ये आल्यावर नताशाच्या लक्षात आले तसे तिने कार्तिकला फोन करून घरून तिचा पंप न विसरता आणायला सांगितले. त्याने होकार दिला. त्याच्या सवयमुळे तिने त्याला चारदा आठवण करून दिली, तरीही तो पंप घ्यायला विसरला. नताशाची चिडचिड झाली. “छोटय़ा गोष्टी मी कायम इग्नोर केल्या आहेत, पण महत्त्वाच्या गोष्टींमध्ये हा कसला बेजबाबदारपणा?’’ फोनवरच ती त्याला ताडताड बोलली. त्यावर “इतकी मोठी जबाबदार बाई आहेस तर तू तुझ्या गोष्टींचा ट्रक ठेव’’ असे त्याने उलट म्हटल्यावर तिच्या मनाला खूप लागले आणि तिने लग्नाला जाण्याचे रद्द केले.
“मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की, हा त्याची चूकच मान्य करत नाही.’’ कार्तिक ती बोलत असताना अस्वस्थ झालेला होता. त्याच्या हाताच्या बोटांची हालचाल त्याच्या मनःस्थितीची जाणीव करून देत होती. “मॅम, मी मान्य करतो की, मी त्या वेळी तिला असं बोलायला नको होतं. पण हिची सारखी पिरपिर चाललेली असते. मग मला त्यावेळी ते काम करायची इच्छाच होत नाही आणि तसंही मला माझ्या स्पेसने कामं करायची असतात.’’ त्याने आता बोलायला सुरुवात केली. “काय स्पेस हवी असते तुला?’’ या प्रश्नावर कार्तिक लगेच उत्तरला, “म्हणजे मला शांतपणे सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि त्या पटकन डनसुद्धा होतात, पण हिला त्याच वेळी गोष्टी लागतात. अगदी माझ्या आईसारख्या…’’ आणि तो पटकन थांबला.
कार्तिकच्या चालढकलीचे कारण आता थोडे थोडे स्पष्ट होताना दिसत होते. तो नताशाच्या त्याच्या मागे लागण्याच्या स्वभावाला आईसारखा स्वभाव समजत होता आणि अजून खोलात बोलल्यानंतर असे लक्षात आले की, त्याची आई कमालीची शिस्तीची होती व भयंकर संतापी होती. तिला सगळी कामे टापटीप आणि जशीच्या तशीच (तिच्या म्हणण्याप्रमाणे) लागायची. जर तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी झाल्या नाहीत तर ती शिक्षा करायची. कार्तिक कायम तिच्या तावडीत सापडायचा. त्याला बाथरूममध्ये किंवा घराबाहेर उभे राहण्याची तसेच भूक लागली तरी काही काळ जेवायला न मिळणे अशा कठोर शिक्षा व्हायच्या. त्यामुळे त्याने कामाच्या जबाबदारींचा एकप्रकारे धसकाच घेतला होता.
“मॅम, आमच्या घरी बाबा मला लपूनछपून खायला द्यायचे. कधीकधी अती झालं की, आईला ओरडायचेसुद्धा, पण आई त्यांचंही ऐकायची नाही. मग त्यांनी नाद सोडून दिला आणि ते अलिप्त झाले. पण मी जबाबदाऱया घ्यायला घाबरत होतो. मला वाटायचं की, जर मी कुठलंही काम करताना चूक केली तर घोर पाप होईल? या विचाराने मनात थरथरायचो. मग ती सवय लागली. काम दुसऱयावर ढकलणे किंवा नंतर करणे. कारण आधी माझे बाबा माझ्यावर लादलेली कामं करायचे आणि आता नताशा. म्हणजे मीच तिला सवय लावली. याचा अर्थ मी बेजबाबदार आहे असा नाही होत. पण हो मला सांगितलेलं काम करताना अनामिक दडपण येतं.’’ एवढे बोलून कार्तिकने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.
नताशा हे ऐकून स्तब्ध झाली. तिच्या नकळत डोळ्यांत पाणी आले. “आय अॅम सॉरी कार्तिक’’ एवढंच ती बोलू शकली. कार्तिकच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या झाल्या होत्या, “माझी आई प्रेमळ आहे, पण तिच्या या शिस्तीमुळे माझं बालपण नासलं. मी घरी जाण्याआधी बाबांना फोन करून विचारायचो की, आज मला कुठलं सामान आणायला सांगितलंय का आणि ती ज्या दुकानातून सांगेल तिथूनच सामान आणायचं हा तिचा कटाक्ष असे. त्यामुळे वाणसमान आणि घरातल्या चिजा आणणं मला आजही नको वाटतं. अजूनही छातीत सूक्ष्म कळ जाणवते. मग नंतर करीन, उद्या करीन असं माझं चालतं. आज आई-बाबा सोबत नाहीत म्हणून मी बिनधास्त आहे.’’ तेवढय़ात नताशा म्हणाली, “तरीच तू गावी त्यांच्याकडे जायला उत्सुक नसतोस. सासूबाई आणि हा जुजबी बोलतात. सासरे मात्र आमच्याशी मोकळे असतात.’’
अर्थात कार्तिकवर काम सुरू झालेच होते, ज्यामध्ये त्याच्या आत्मविश्वासावर जास्तीत जास्त भर दिला गेला. कारण लहानपणी त्याच्या काम करण्याच्या पद्धतींवर, त्याच्या चुकांवर अतिशय चुकीच्या प्रकारे आईकडून बोट ठेवण्यात आले होते. त्यामुळे शिक्षा आणि भीती कमी होण्यासाठी ‘टाळाटाळ’ हे त्याने डिफेन्स मेकॅनिझम वापरले होते. ज्याची सवय त्याला आजही होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नताशाच्या बोलण्याच्या पद्धतीला त्याने आईची पद्धत असे संबोधन देऊन तसेच डिफेन्स मेकॅनिझम वापरले होते. ज्यामुळे नताशावरचा ताण वाढला होता. कार्तिक आणि नताशा हे दोघेही स्वतवर तसेच एकमेकांवर लक्ष ठेवून होते. नताशाने स्वतची बोलण्याची पद्धत बदलली आणि कुठलेही काम किंवा गोष्ट करताना आवर्जून त्यात कार्तिकला सामील करायला लागली.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)