
>> प्रा. विश्वास वसेकर
फूल सुंदर कशामुळे होतं? त्याच्या आकर्षक रंगामुळे का सुगंधामुळे? पाश्चात्त्यांना रंग प्रिय, आपल्याला गंध. देवाच्या पूजेत निर्गंध फूल वापरत नाहीत. पृथ्वीच्या उक्रांतीत फुलांचा जन्म कधी झाला ते विज्ञान माहीत नाही. अध्यात्म रामायणात असं लिहिलं आहे की रामाचा राज्याभिषेक झाला नव्हता तोपर्यंत सगळीच फुलं निर्गंध होती. रामाचा राज्याभिषेक झाला नि सगळी फुलं सुगंधित झाली! किती सुंदर! यातलं बॉटनी खोटं असलं तरी कल्पना किती रम्य आहे.
बहिणाबाईंच्या संवेदना मोठय़ा तल्लख असल्या पाहिजेत. तरीही त्या गमतीनं एके ठिकाणी लिहितात, हातामधी फूल धरलं, उराशानं नाक भरलं. सर्दीपडसं जर जोरात असेल तर हातात फूल येऊन काय उपयोग? पण माझ्या सुदैवाचा कहर असा की, सर्दीपडशानं बारोमास त्रस्त असूनही माझी गंधसंवेदना तल्लख असते. त्याही काळात मला सगळे वास येतात. सगळे सौरभबंध बांधून, खिळवून ठेवतात. सौरभबंधांच्या सरसकट सगळ्याच आविष्कारांनी माझं जगणं सुंदर बनवलंय.
त्यातला मृद्गंध मला परमप्रिय आहे. ग्रीष्मात शेकून निघालेल्या ढेकळांवर पावसाच्या पहिल्यावहिल्या सरी कोसळतात तेव्हा जर आपण रानात असू तरच हा भाग्यवंत क्षण आपल्या वाटय़ाला येऊ शकतो. मातीच्या या वासावरून हजारो अत्तरं कुर्बान आहेत. इंदिरा गांधींना मुद्गंध फार आवडायचा. हिंदीत त्याला ‘सोंधी’ असा सुंदर शब्द आहे. भूः म्हणजे पृथ्वी ही नाकाची अधिष्ठात्री देवता आहे असं मी गणपती अथर्वशीर्षात वाचलं तेव्हा मला मुद्गंधाशी संबंधित सृजन, काम, संवेदना पंचमहाभूते आणि माणूस या सर्वांच्या अनेकपदरी नात्याची जाणीव झाली. मृदगंध स्वीकारणे ही एक धन्य करणारी अनुभूती असते.
मृदगंधाच्या खालोखाल प्रियतम गंध आहे चंदनाचा. मात्र हा लाभतो क्वचित. सुगंधाबरोबर शीतलता हा चंदनाचा गुण ज्ञानेश्वरांना भावला. एकाच वेळी दोन सुखकारक संवेदना देण्याचे चंदनाचे सामर्थ्य ज्ञानेश्वरांना स्पर्शून गेले. चंदनाचा गौरव करताना त्यांची प्रतिभा बहरून येते. चाफ्याचं झाड जसं चाफेकळ्यांनी डवरलेलं असतं तशी चंदनाच्या सर्वांगावर सदैव सुगंधाची उटी चर्चिलेली असते असं ते म्हणतात.
उद हादेखील माझा अत्यंत आवडता सुगंध आहे. माझं इस्लाम संस्कृतीशी असणारं गतजन्मीचं नातं हा उदाचा गंध मला सांगत असतो. परभणीचा तुरुत पीरचा दर्गा, उरुस, मुशायरे, कव्वाली, संदल यांचे अनेक सहचरी भाव हा उद जागे करतो. या उदामध्ये माझा स्मरणगंध आहे. उदविणे ही प्रक्रिया प्रथम जेव्हा कळाली तेव्हा त्या सौख्याच्या निव्वळ कल्पनेने मी हरखून गेलो होतो. विपुल केशसंभार लाभलेल्या सुंदरीने न्हाल्यानंतर, ग्रीष्माची नाजूक टोपली, उदवावा कचभार तिच्यावर! हे करून झाल्यानंतर तिच्या केसांना जवळ घेण्याचे, हुंगण्याचे माझे स्वप्न साकार होणे अजूनही बाकी आहे. परंतु मी आशावादी आहे. उदाचं पुन्हा मृदगंध आणि चंदनाप्रमाणे मातीशी, पृथ्वीशी थेट नातं आहे. कारण तो स्टायरेसी कुलातील एका झाडापासून तयार होतो. उदाचा सौरव, सांगे भूमीचे मार्दव…
हे सगळे सुगंधोत्सव झाडाशी नातं सांगणारे, पण एखाद्या वनस्पतीचं चिमुकलं पानदेखील किती सुगंधी असू शकतं हे मरव्याचा गंध अनुभवल्याशिवाय खरं वाटणार नाही. मरवा मला आधी इंदिरा संतांच्या कवितेत भेटला अन् मग प्रत्यक्षात… हिरवा ही वास्तविक रंगसंवेदना! पण हिरवेपण आणि मरव्याचा गंध हे एवढं अद्वैत असतं की इंदिराबाई असा संवेदनासंकर का करतात हे पटतं. बोटाच्या चिमटीतही झाकून जाणाऱया मरव्याच्या इवल्याशा पानात केवढं सौख्य दडलं आहे… आणि फुलं? ती नसती तर माझ्यासारखा पुष्पपरायण माणूस एक दिवस तरी या पृथ्वीवर थांबू शकला असता का? फुलं नसती तर माणूस प्रेयसीवर प्रेम तरी करू शकला असता का? फुलांच्याशिवाय माणसांचे विवाह आणि मधुचंद्र होऊ शकले असते का? फुलं नसती तर उत्सवप्रिय माणसाने काय केलं असतं! फुलं नसती तर मखदूम मोहिनुद्दीन यांची ही ‘महकती हुई’ गझल आपल्याला मिळाली असती का? फिर छिडी रात, बात फुलों का, रात है या बारात फुलों की …
जीव ओवाळून टाकावा अशी ही सुमगझल आहे. आणखी एक बशीर बद्र नावाचा कवी म्हणतो, गझलला हळुवारपणे वाचा, कारण ‘यह रेशमी लहेजा है, तितली की कहानी है, खुशबू की जुबानी है’ माणसाच्या हातात जर फूलच आलं नसतं तर माणूस मुळी कवी झालाच नसता, पशूच राहिला असता.
फुलांचा वास आधी लांबून येतो का ते पाहावे? किती लांबून येतो तेही पाहावे. टाकळणीच्या वृक्षसमूहाचा लहानपणी अनुभवलेला गंध अजूनही माझ्या स्मरणात ताजा आहे. वश्याला (माझे गाव) पांडय़ाच्या वाडय़ात मागील बाजूला कुंपणासारखी लावलेली टाकळणीची पाचपन्नास झाडं आमच्या खेळण्यात सुंदरसा व्यत्यय आणीत. अंबाजोगाईत बसस्टॅण्डसमोर असणारा बुचांचा वृक्षसमूह. सप्टेंबर ऑक्टोबरात मला असाच पागल करत असे. माझ्या नूतन महाविद्यालयात दर सप्टेंबरमध्ये मी लक्ष ठेवून असतो की बुचाचं टपकलेलं फूल पाहण्याआधी झाडावरच्या कळ्या पाहायच्या. पण दरवर्षी त्याची पहिली भेट खाली टपकलेल्या फुलातच होते.
कडुनिंबाचा सुगंधही असा दुरूनच येतो नि घ्यावा. वारा रुणझुणा वाहत असतो आणि गंधाचं हे अमूल्य लेणं आपल्यापर्यंत पोहोचवतो. उर्दूत फार सुंदर शब्द आहे. बाद-ए-सबा. सकाळच्या वेळी उद्यानावरून येणारा सुगंधित वारा म्हणजे बाद-ए-सबा. शिरीषकुसुमांचा गंधदेखील दुरूनच घ्यावा. नाजुकपणाची उपमा झालेलं हे फूल हाताळण्याचा आग्रह नको. सेलूतील विद्यानगरातलं माझं ‘गाणे’ हे घर मी रिकामा प्लॉट घेऊन बांधलं. तोच प्लॉट घेण्याचं एकमेव कारण त्याच्यासमोर शिरीषाचं प्रचंड मोठं झाड होतं. घराचा पत्ता समजून सांगताना मी अभिमानाने शिरीषाचा उल्लेख करीत असे. रोप लावून त्याच्या फुलांची वाट पाहात बसाल तर म्हातारे व्हाल. त्यापेक्षा तो जिथे वाढलाय तिथे जाऊन राहणंच श्रेयस्कर.
पारिजातकाच्या फुलाकडे पाहिलं की ते खरंच स्वर्गातलं फूल वाटतं. तिथंही त्याच्या बॉटनीपेक्षा त्याची पुराणकथा आवडते. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या चौदा रत्नांपैकी तो एक. इंद्रानं त्याला स्वर्गात नेऊन लावला. सत्यभामेने त्याची अभिलाषा धरली म्हणून कृष्णाला पृथ्वीवर त्याला आणण्यासाठी इंद्राशी युद्ध करावं लागलं. रंगावरून दुर्गाबाईंनी त्याला मोती पोवळ्याचं फूल म्हटलं आहे.
मात्र गुलाबाइतकी माझ्या मनात पारिजातकालाही जागा नाही. रूप, शिल्प, रंग आणि गंध याबाबतीत गुलाब खरोखर फुलांचा राजा आहे. रूपशिल्पाच्या बाबतीत रुईचं फूल थोडी त्याच्याशी स्पर्धा करू शकतं. रुईचं फूल मला एखाद्या सागवानाच्या लाकडात कातल्यासारखं सौष्ठवपूर्ण वाटतं. पण गुलाबाइतकं रूपलावण्य त्यालाही नाही. गुलाबाचा रंग तर एवढा वैशिष्टय़पूर्ण की लाल रंगाच्या या रंगच्छटेला त्याच्यावरून नाव पडलं. गुलाबी. गंध तर असा अप्रतिम की दुसरा इतका सुगंध फक्त प्रेमालाच असू शकतो. म्हणून की काय प्रेमाचंही तो प्रतीक बनला.
गुलाबाविषयी मी इतकं गुलाबी होऊन लिहितोय, कारण नागचाफ्याचं फूल मी अजून पाहिलं नाही. ‘कंबख्त तूने पी ही नहीं’सारखं. दुर्गाबाईंचा आदर्श असणाऱया विल्यम जेम्सना नागचाफ्याचं, नागकेशराचं फूल हे जगातलं रूप, आकार, शुभ्र व मधला केशरी पुंजका असलेले आणि सर्वश्रेष्ठ सुगंधी फूल वाटतं. दुर्गा भागवत लिहितात, ‘मी हे फूल पाहिलं नि केसात घातलं तेव्हा मला धन्य धन्य वाटलं.’ मी दुर्दैवी माणूस आहे. अजून हे फूल पाहिलं नाही. ते माझ्या बागेसाठी लाभेल तेव्हा माझ्या सर्व प्रार्थना संपतील.
आपल्या जगाला फुलबाग करूया, सुमलोक बनवू या. ज्ञानेश्वरांनी आठव्या अध्यायात सुखाला सुगंध येतो अशी कल्पना मांडली. ‘पिकलिया सुखाचा परिमळू.’ फुलांच्या प्रदेशातून प्रवास केला की सुखालाही सुगंध येणारच.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत)