
>> रवींद्र घाडगे
द्राक्ष हंगामाची सांगता झाल्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत खरड छाटण्या पूर्ण झाल्या. पुढे मे महिन्यापाठोपाठ जून महिन्यातही जोरदार पाऊस बरसल्याने द्राक्ष बागांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकीकडे हा काळ सूक्ष्म घडनिर्मितीचा असताना पावसाने दाणादाण केल्याने द्राक्षांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकाला बसून येणाऱ्या काडीवरील गर्भधारणा आणि फळधारणेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यातच रोगराईचा फटकाही बसणार आहे. द्राक्षाची खरड छाटणी पूर्ण झाली आहे. खरड छाटणी होऊन ४० ते ४५ दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यादृष्टीने शेतकरी हंगामाच्या तयारीचे नियोजन करू लागला आहे. विरळणी, शेंडा मारणे अशी कामे सुरू होत आहेत. गतवर्षी माल कमी होता. त्यामुळे वेली सशक्त आहेत. मात्र, या वातावरणामुळे संकट ओढावले आहे. गर्भधारणा होण्यासाठी फवारण्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कितीही पाऊस होऊन फळबागत पाणी का साचलेले असेना परंतु महागड्या औषधांची फवरणी ही नित्याचीच होऊन आतापासून खर्च करावा लागत असून, खर्चही वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार हे निश्चित आहे. एकीकडे मजूरटंचाई, दुसरीकडे बागेत साचलेले पाणी व वाढत्या पीक संरक्षण खर्चामुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. मे महिन्यामध्ये द्राक्ष बागेसाठी पाण्याचा ताण व उन्हाची गरज असते; मात्र यंदाचा पाऊस व चित्र परस्परविरोधी आहे. त्यामुळे द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. मात्र, प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्टोबरपर्यंत गोडी बहर छाटणी होईपर्यंत पाने टिकतील की नाही, याची शाश्वती नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सततच्या पावसामुळे सूर्य दर्शन नसल्याने द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोग, करपा, भुरी, डाऊनीचा प्रादुर्भाव वाढल्याने पाने खराब होत असून थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने अडचणीत वाढ होऊन पावसामुळे बागेत पाणी साचून राहत असल्याने पांढऱ्या मुळ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन कोवळ्या फुटीमध्ये पानाच्या हिरव्या शिरा लाल पडून अन्नग्रहण होत नसल्याने द्राक्षवेली अशक्त, पानाच्या वाट्या तयार होण्याचे प्रमाण वाढले. बागातील तणनियंत्रणसुद्धा करता येईना. अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत असल्याचे आंतरवाली सराटी येथील शेतकरी छगन राजपुरे यांनी सांगितले.