
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली असून या वक्तव्याबाबत अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. त्यावर आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यावर अजित पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची कोणाची हिंमत आहे, ते काय बोलले, ते सर्वांनी पाहिले आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. तसेच चोऱ्यामाऱ्या लांड्यालबाड्या कोण करतंय, हे जनतेला माहिती आहे, असे सांगत त्यांनी जबरदस्त टोला लगावला.
धीरुभाई अंबानी यांच्याबाबत अजित पवार जे बोलले ते सर्वांनी ऐकले आहे. त्यामुळे वक्तव्याचा विपर्यास वैगेर काही नाही. अजित पवार यांच्याबाबत चुकीचे दाखवण्याची कोणाची हिंमत आहे काय, ध चा मा करयाला हा काय आनंदीबाई यांचा काळ आहे काय, असा सवाल करत त्यांनी टोला लगावला. धीरुभआई अंबानी देशातील महत्त्वाचे उद्योगपती होते. देशातील उद्योग, व्यापार, व्यवसाय याला उर्जितावस्था देण्याचे काम धीरुभाईंनी त्या काळात केले, हे सत्य आहे. आज रिलायन्सचे जे साम्राज्य आहे, त्याचा पाया धीरुभाईंनी घातला आहे. कोण चोऱ्या करतंय, कोण काय करतंय, याबाबतचे वक्तव्य अजित पवार यांनी केले. मात्र, धीरुभाईंच्या मागे कधी ईडी लागली नव्हती किंवा त्यांच्या कारखान्यावर कधी जप्ती आली नव्हती. त्यामुळे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले होते, असे आपण सांगू शकतो, असे संजय राऊत म्हणाले.
आता भाजपसोबत गेलेले जरांडेश्वर सारखे साखर कारखानदार त्यांच्यावर ईडीच्या, इन्कमटॅक्सच्या जप्त्या आल्या होत्या. त्यामुळे चोऱ्यामाऱ्या, लांड्यालबाड्या राजकारणात आणि व्यवसायात कोण करतंय, हे जनतेला माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.