
पहलगाम हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानी दहशतवादाविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत असताना भारतीय सैन्याने केलेल्या चढाईमध्ये दहशतवाद्यांचे एक एक अड्डे उद्ध्वस्त होत होते. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा एक फोन आल्यानंतर मोदी सरकारने माघार घेत युद्धविराम जाहीर करीत माघार घेतली. देशासाठी ही नाचक्की असल्याचे सांगत देशात सध्या ‘डी’ कंपनीचे म्हणजेच ‘डरपोक’ कंपनीचे राज्य असल्याचा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश सरकारसोबत असताना मोदी सरकारनेच ‘सिंदूर वाटप’सारख्या कार्यक्रमातून राजकारण केल्याचेही संजय राऊत म्हणाले. हा कार्यक्रम म्हणजे अतिरेकी हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या भगिनींचा अपमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हा हल्ला करणारे अतिरेकी दोन महिन्यांनंतरही सापडले नाहीत, हे केंद्र सरकारचे अपशय असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हिंदुस्थानात दहशतवादी हल्ला झाल्यानंतरही मोदींचे मित्र ट्रम्प पाकिस्तानच्या लष्कराधिकाऱयांना व्हाइट हाऊसमध्ये जेवणावळीसाठी बोलवून ‘आय लव्ह यू पाकिस्तान’ म्हणतात हे मोदींचे अपयश असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत यांनी मिंधे गटाच्या कार्यक्रमाची चांगलीच सालटी काढली. मिंधे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन खरे तर सुरतमध्ये व्हायला हवा असा टोला त्यांनी लगावला. कारण तुमच्या पक्षाची स्थापना गुजरातमध्ये झाली असून तुमचे मालक दिल्लीत बसलेत. मात्र बाळासाहेबांची शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही. कुणाच्या चरणाशी बसली नाही, असेही ते म्हणाले. डोंगर कधी म्हातारा होत नाही. तुफानाचा वय मोजायचं नसतं आणि वाघ कधी शरण जात नाही, गवत खात नाही. मात्र स्वतःला वाघ समजणारे जे लोक आहेत ते मोदी-अमित शहांचे गवत खात आहेत.
संघर्ष हाच शिवसेनेच्या विजयाचा मंत्र
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आता 59 वर्षांची झाली असून स्थापनेपासून संघर्ष हाच शिवसेनेच्या विजयाचा मंत्र राहिला आहे. ‘शिवसेना’ हा देशातल्या राजकारणातील चमत्कारच आहे. शिवाय सद्यस्थितीत सर्व पक्षांमध्ये शिवसेना सर्वात जुना पक्ष असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना विचाराने तरुणच होत असून डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचे नाही, असेही ते म्हणाले.