
मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया सातही तलावांमध्ये सध्या 364233 दशलक्ष लिटर म्हणजेच 25 टक्के जलसाठा जमा झाला आहे. हे पाणी पुढील 95 दिवसांसाठी म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पुरणारे आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 850 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 1 ऑक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी जमा होणे गरजेचे असते. या साठय़ानुसार मुंबईच्या वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. त्यामुळे जूनपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होणे गरजेचे असते. मात्र या वर्षी मेअखेर सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीचा काही काळ धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने जलसाठा 10 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आले होते. मात्र जूनमध्ये गेल्या दोन आठवडय़ांत बरसलेल्या मान्सूनने कसर भरून काढत जोरदार बरसल्याने जलसाठा 25 टक्के जमा झाला आहे. यातच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे मुंबईचे संकट टळले आहे.
20 जून रोजी धरणांतील पाणी
– अप्पर वैतरणा – 61028 दशलक्ष लिटर
– मोडक सागर – 57337 दशलक्ष लिटर
– तानसा – 40693 दशलक्ष लिटर
– मध्य वैतरणा – 42680 दशलक्ष लिटर
– भातसा – 148462 दशलक्ष लिटर
– विहार – 11026 दशलक्ष लिटर
– तुळशी – 3007 दशलक्ष लिटर
गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक जलसाठा
– सातही तलावांत मिळून 20 जून रोजी 364233 दशलक्ष लिटर म्हणजेच 25.38 दशलक्ष लिटर जलसाठा जमा आहे. गतवर्षी 2024मध्ये हा जलसाठा 77052 दशलक्ष लिटर म्हणजेच 5.32 होता.
– तर 2023 मध्ये हा जलसाठा 111675 दशलक्ष लिटर म्हणजे 7.72 टक्के जमा होता. या वर्षी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक जलसाठा जमा आहे.