
स्मशानभूमी नसल्याने शहापूरच्या शेंद्रुण खुर्द गावामध्ये चक्क उघड्यावर भरपावसात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे समोर आले आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूरच्या शेंद्रुण खुर्द गावातील हे विदारक चित्र असून दरवर्षी पावसाळ्यात ताडपत्रीचा आधार घेऊन गावकऱ्यांना सरण रचावे लागत आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही ही मरणकळा कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मरणानंतरच्या या नरकयातनांविषयी अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने खोके सरकारचा विकास सरणावरच असल्याचे उघड झाले आहे.
शहापूर तालुक्यातील शेंद्रुण खुर्द गावातील 28 मे रोजी अंजना वाळिंबे (48), 13 जून रोजी कोंडू भाकरे (79), 14 जून रोजी सोनाबाई वाघ (84), 18 जून रोजी दौलत भगत (50) या चार व्यक्ती मृत पावल्या. तसेच येथील मृत बाबू पाटोळे (52) यांच्यावर 18 जून रोजी प्रचंड पाऊस असल्याने शेंद्रुण बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र शेंद्रुण खुर्द गावामध्ये स्वातंत्र्याच्या काळापासून स्मशानभूमी नसल्याने चक्क शेताच्या बांधावर ऐन पावसात ताडपत्री, मेण कापडाचा आधार घेऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरदेखील ही भयंकर परिस्थिती असल्याने संताप व्यक्त होत आहे.
निधी जातो कुठे? चौकशी करा !
ग्रुप ग्रामपंचायत शेंद्रुण कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेंद्रुण खुर्द येथे स्मशानभूमी व्हावी यासाठी अनेक वेळा निधी मंजूर झाला आहे. मात्र येथील अनेक तांत्रिक अडचणी सोडवण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याने स्मशानभूमी होत नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीसाठी आतापर्यंत आलेल्या निधी नेमका गेला कुठे याची चौकशी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.