राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरुच; पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने दडी मारल्याने राज्यात पुन्हा उकाडा जाणवू लागला होता. आता राज्यात पाऊस सक्रीय झाला आहे. त्यामुळे याआठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात 25 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या तीन दिवसापासून कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यासह परिसरात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवारी मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आलेत. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडणार आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेज अलर्ट दिला आहे. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी रत्नागिरीमध्ये दिवसभर पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 562 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे 80 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची चिंता आहे. शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली. नागपूरमध्ये कमाल तापमान 37.8 अंश होते. आता 24 जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.