
भय आणि भ्रष्टाचार हाच भाजपचा मंत्र असून त्यांनी राज्यात शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी याचा वापर केला. मोदी, शहा, फडणवीस यांनी राज्यात भय आणि भ्रष्टाचारनिर्मितीचे काम केले. त्यामुळे तपास यंत्रणेच्या आणि अटक होण्याच्या भीतीने भ्रष्टाचारी आमदार, खासदार पळून गेले. ते आता भाजपच्या भयाखाली असून ते त्याच भयातून वक्तव्ये करत आहेत, अशा श्ब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नते, खासदार संजय राऊत यांनी गद्दारांना फटकारले आहे.
आपल्या पक्षाचे खासदार, आमदार फुटून जावे, असे कोणालाच वाटणार नाही. मात्र, ज्यांना गद्दारीचे शेण खायचे आहे, त्यांना कोण थांबवणार? पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांचा दबाव आहे, त्यांना कितीही थांबवले तरी ते थांबणार नाहीत. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणि आपण स्वतः पळून जाणाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, प्रत्येकाचे दुखणे आणि आजार वेगळे होते. उदाहरण द्यायचे तर गुलाबराव पाटील यांच्या खात्यात 40 ते 50 कोटी रुपये कुठूनतरी जमा झाले होते. त्यामुळे आता ईडीची कारवाई होणार, अटक होणार या भीतीने ते थरथरत होते. त्यामुळे मला जावे लागले, असे त्यांनी सांगितले.
राज्यात पसरलेला हा भ्रष्टाचाराचा कॅन्सर आहे, त्याला कोण काय करू शकतो? भय आणि भ्रष्टचार यामुळे शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार, आमदार पळून गेल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. हे भय आणि भ्रष्टाचार निर्मितीचे काम नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांनी केले, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मोदींनी प्रेसिडेंट ट्रम्प यांना फोन करायला हवा होता…
जागतिक शांतता महत्त्वाची आहे. युद्ध हे चांगले नाही, त्यात सामान्य जनतेचेच नुकसान होते. युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला. मात्र, त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्प यांना फोन करायला हवा होता. हिंदुस्थान -पाकिस्तान युद्ध थांबवले, असा दावा ट्रम्प करत आहेत. त्यांनी हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध थांबवले. मात्र, इराण- इस्रायल युद्धात त्यांची भूमिका वेगळी आहे. त्यांनी युद्ध थांबवण्याऐवजी इस्रायलची बाजू घेत इराणवर बॉम्ब टाकले. ट्रम्प हे मोदींचे मित्र आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभाही घेतल्या आहेत. असे असूनही ट्रम्प यांनी दुटप्पी भूमिका का घेतली, आता ते इराण-इस्रायल युद्ध का थांबवत नाहीत, असे मोदींनी त्यांना विचारायला हवे, असेही संजय राऊत म्हणाले.