
हिंदुस्थानच्या शेजारी देशांना स्पष्ट इशारा देत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. कारण या निवेदनात 26 निष्पाप नागरिकांचा जीव घेणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता आणि हिंदुस्थानच्या दहशतवादाविरोधातील ठाम भूमिकेचे प्रतिबिंब त्यात दिसून आले नव्हते. या निवेदनात पहलगामचा उल्लेख टाळण्यात आला, पण बलुचिस्तानचा उल्लेख करून हिंदुस्थानवर अप्रत्यक्षपणे तेथे अशांतता निर्माण केल्याचा आरोप केला गेला. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन चे अध्यक्षपद चीनकडे असल्याने हे निवेदन पाकिस्तानच्या आग्रहावरून तयार करण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हिंदुस्थानने यापूर्वीही पाकिस्तानचे बलुचिस्तानबाबतचे आरोप फेटाळले आहे. तसेच पाकिस्तानने आधी स्वतःकडे पाहावे आणि निराधार आरोप करण्याऐवजी दहशतवादाला पाठींबा देणे थांबवावे, असे ठणकावून सांगितले आहे.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या चीनमधील चिंगडाओ येथे SCO च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीसाठी उपस्थित आहेत. या बैठकीत रशिया, पाकिस्तान, चीनसह इतर सदस्य देशांनी भाग घेतला आहे. २००१ मध्ये स्थापन झालेल्या SCO संघटनेचे उद्दिष्ट प्रादेशिक स्थिरतेसाठी सहकार्य वाढवण्यासाठी आहे. या गटात सध्या १० सदस्य राष्ट्रे असून त्यात बेलारूस, चीन, हिंदुस्थान, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे.
चीनमध्ये झालेल्या या शिखर परिषदेत राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्व सदस्य देशांनी एकत्र यावे, कारण प्रादेशिक सुरक्षितता आणि शांततेसाठी दहशतवाद हे सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच अतिरेकी विचारसरणी, दहशतवाद आणि विश्वासाचा अभाव हेच या समस्यांचे मूळ आहेत असेही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना सिंह म्हणाले की, हिंदुस्थानने दहशतवादाविरोधात स्वतःचे संरक्षण करण्याचा हक्क बजावला आहे आणि भविष्यातील अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. या हल्ल्यात पीडितांना त्यांच्या धार्मिक ओळखीवरून निवडून गोळ्या झाडल्या गेल्या. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाच्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या गटाने घेतली आहे. या हल्ल्याची पद्धत लश्करच्या पूर्वीच्या हल्ल्यांसारखीच होती. भारताने हे दाखवून दिले की दहशतवादाची केंद्रबिंदू असलेली ठिकाणे आता सुरक्षित राहिलेली नाहीत आणि आम्ही अशा जागांना लक्ष्य करण्यात मागे हटणार नाही असेही सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार देणे म्हणजे हिंदुस्थानच्या दहशतवादाविरोधातील कठोर भूमिकेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार आहे असे सांगितले जात आहे.