
पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा हट्ट सरकारने सोडावा अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केली आहे. तसेच हिंदी सक्ती केल्यास मातृभाषा बाजूला पडेल असेही शरद पवार म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, माझ्यामते प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्ती करू नये. पाचवी नंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही. देशाचा एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो. आणि त्यामुळे हिंदीला अगदी त्याज्य करावे असे नाही. पण हे जरी खरं असलं तरी मुलांना एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात करू शकेल त्यावर भाषेचा किती दबाव टाकावा लागेल याचाही विचार करणे गरजेचे आहे. तो दबाव टाकला आणि मातृभाषा बाजूला पडली तर ते अयोग्य ठरेल. म्हणून पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा हट्ट सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची असली पाहिजे असे शरद पवार म्हणाले.
तसेच त्याच्यानंतर जे काही करायचं असेल पाचवीनंतर कुटुंबातील लोक निर्णय घेतील, त्याला आमचा विरोध नाही. पण आता जे बाकीचे सगळे लोक बोलत आहेत, की ठाकरे बंधू जे म्हणाले त्यात काही चुकीचं नाही. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील तर भुमिका घेत असतील तर मातृभाषेच्या दृष्टीने ती चांगली बाब आहे असेही शरद पवार म्हणाले.