
हिंदी सक्तीच्या शासन आदेशांची जाहीर होळी करून मराठी माणसाने आज सरकारला दणका दिला. त्याच वेळी 5 जुलैला काढण्यात येणाऱ्या ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाचा महायुतीने धसका घेतला. या एकजुटीचा आणि एकत्र उठवलेल्या आवाजाचा प्रचंड विजय झाला. या मराठी शक्तीपुढे झुकत महायुती सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही आदेश रद्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन करण्यात येत असून तीन महिन्यांत समिती अहवाल देईल. हा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हिंदी भाषेला विरोध नाही, पण सक्ती लादू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समविचारी पक्ष तसेच मराठी भाषेचे अभ्यासक, तज्ञ यांसह तमाम मराठी माणसांनी आज हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी केली. 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाचीही शिवसेना आणि मनसेकडून जोरदार तयारी सुरू झाली होती. त्याचबरोबर विधिमंडळ अधिवेशनातही हिंदी सक्तीच्या मुद्दय़ावरून सरकारला धारेवर धरण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारचे धाबे दणाणले. त्यामुळेच सरकारला दोन्ही आदेश रद्द करत असल्याचे जाहीर करावे लागले. हिंदीबाबतचे आम्ही काढलेले 16 एप्रिल आणि 17 जून 2025चे दोन्ही शासन निर्णय रदद करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे, असे फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आता त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कोणत्या वर्गापासून लागू करावी, कशी करावी याचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार याबाबतचा निर्णय करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमच्याकरता मराठी भाषा आणि मराठी विद्यार्थी महत्त्वाचा आहे. आमची निती मराठी केंद्रित असेल. मराठी विद्यार्थी केंद्रित असेल. यात कोणतेही राजकारण करायचे नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन्ही जीआर रद्द केल्याचा जीआर काढा – दीपक पवार
दोन्ही जीआर रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी त्यावर आमचा विश्वास नाही. त्यांनी दोन्ही जीआर रद्द केल्याचा जीआर काढावा आणि त्या नव्या जीआरमधील शब्दयोजनाही संशयास्पद नसावी, अशी प्रतिक्रिया मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी दिली.
राक्षसी बहुमताचा अहंकार गळून पडलाः हर्षवर्धन सपकाळ
सरकारचा रक्षसी बहुमताचा अहंकार गळून पडला! मराठी अस्मितेचा विजय झाला, अशी एक्स पोस्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रभर निर्माण झालेल्या जनआक्रोशासमोर अखेर महाभ्रष्ट महायुती सरकारला नमते घ्यावे लागले. पण यापुढेही आपणा सर्वांना सजग रहावे लागेल. सत्तेत बसलेले लोक मायावी आहेत. त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा राबविण्याचा प्रयत्न ते पुन्हा करतील आपण तो पुन्हा हाणून पाडू, असे सपकाळ यांनी नमूद केले.
समितीला तीन महिन्यांची मुदत
शिक्षण तज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काही सदस्य असतील त्यांची नावे लवकरच जाहीर होतील. या समितीने तीन महिन्यांची मुदत मागून घेतली आहे. त्रिभाषा सूत्र या समितीच्या अहवालाच्या आधारावर लागू केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.