
राज्यातील मराठी भाषेची गळचेपी, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, विविध खात्यांतील भ्रष्टाचार, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा योजना, मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, शक्तिपीठ महामार्ग अशा सर्व विषयांवर अतिशय असंवेदशील असलेल्या महायुती सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज महाविकास आघाडीने घेतला. हे महाराष्ट्रद्रोही, महाभ्रष्टाचारी, महाझुठे आहेत. या सरकारच्या चहापानाला जाणे हे पाप ठरेल, असा हल्ला यावेळी शिवसेना विधीमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी चढवला.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेसन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशात महायुती सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या अजिंक्यतारा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते व शिवसेना विधिमंडळ पक्ष नेते आदित्य ठाकरे, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, उपनेते अमीन पटेल, आमदार सजेत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
चहापानावर बहिष्कार टाकण्यामागील भूमिका स्पष्ट करताना शिवसेना विधिमंडळ पक्ष नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या चहापानाच्या कार्यक्रमाला जायचे म्हणजे पाप आहे. ही महायुती नव्हे तर महाझुठी सरकार आहे म्हणजे भाजप व दोन गद्दार गँग हे सरकार ज्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांची तीन दिशेला तीन तोंडे आहेत. कधी बंगल्यांवरून एकमेकांमध्ये भांडतात तर कधी मोटारींवरून तर कधी कोणत्या जिह्याचे कोण मालक मंत्री तर कोण पालक मंत्री बनणार आणि माझा फंड यांनी चोरला हे लोक मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे सांगतात. कदाचित त्यांच्यामध्ये समन्वयाची गरज आहे. म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण चहापानाला जायचे नाही. निदान चहापानाच्या कार्यक्रमात एकमेकांची तोंडे तरी बघतील, असा टोला त्यांनी मारला.
मर्डर करणारा बाजूला बसत असेल तर पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मर्डर करूनच मोठे झाले असे वक्तव्य मिंधे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे मंत्री खून करून पंतप्रधानांच्या बाजूला कॅबिनेटमध्ये बसत असतील तर पंतप्रधानांच्या सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण झाला आहे. एखादा जबाबदार मंत्री असे वक्तव्य करत असेल तर पोलिसांनी बोलावून त्यांचा जबाब घेतला पाहिजे. नक्की तुमच्याकडे काय माहिती आहे याची चौकशी केली पाहिजे. कोणते खून झाले आहेत यासाठी दोघांची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी बोलावून घ्यायला पाहिजे.
कुठे नेलाय हा महाराष्ट्र!
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडला आहे. सत्ताधारी पक्षातील राजकीय व्यक्तींकडूनच आपल्या सुनेची हुंडय़ासाठी केलेली हत्या, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, नांदेडमध्ये चार दिवसांत एक खून, अमली पदार्थांचे राजाश्रयित रॅकेट, पोलीस दलातील भ्रष्टाचार, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना मिळणारा राजाश्रय, विविध गुह्यांतील आरोपांना पाठीशी घालण्यासाठी पोलिसांवरील दबाव टाकून होणार राजकीय हस्तक्षेप, सत्ताधाऱ्यांकडून महिला पोलिसांचा विनयभंग होत आहे. भाजप व गद्दारांनी कुठे नेऊन ठेवलाय हा पुरोगामी महाराष्ट्र, असा सवाल विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यानिमित्ताने केला.