आरपारची लढाई… जिंकल्याशिवाय मागे फिरायचे नाही! 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडक, राज्यव्यापी बैठकीत जरांगेंचा निर्धार

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता रणभूमीत उतरून शेवटची आरपारची लढाई जिंकायची आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. त्यासाठी 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून कूच करणार आणि 29 रोजी मंत्रालयावर धडकणार, असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. आंतरवाली सराटी येथे आज रविवारी मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते.

जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्षांचा वेळ दिला. पण, आता संयम संपला आहे. आता ओबीसीमधूनच आरक्षण घेणार. आता वाशीबिशी नाही, सरळ मुंबईत जायचे आणि  मुंबईत शांततेत आंदोलन करायचे. आम्ही फडणवीसांचे शत्रू नाही. पण, मुंबईकडे जाताना एकाही मराठय़ाला काठी लागली तर मुंबईसह राज्यभरातील मुख्य रस्ते, पाणंद रस्तेसुद्धा मोकळे राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आता मैदानही आपणच गाजवायचे आणि गुलालही आपल्याच अंगावर घ्यायचा आहे. त्यामुळे ही आरपारची  लढाई पार करायची असल्याचे ते म्हणाले.

27 ऑगस्टला प्रस्थान

27 ऑगस्टला आंतरवालीतून सकाळी 10 वाजता निघणार असून, शहागड, पैठण फाटा, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर चौक, पांढरी पूल, आळेफाटा, शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, पुढे वाशी, चेंबूरमार्गे 28 रोजी मुबईत पोहोचणार असून, 29 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

काय आहेत मागण्या?

मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा, हैदराबाद सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करा, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घ्या, मराठा आंदोलनात बळी गेलेल्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि आर्थिक मदत करा, शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या, आमच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आहेत.

मुंबईला जाण्याची तयारी करा

58 लाख नोंदी निघून चार कोटी मराठा आरक्षणात गेले आहेत. उद्यापासून मुंबईला जाण्याची तयारी करा, गावपातळीवरील नेत्यांनादेखील मुंबईला जाण्याचा हट्ट धरा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी गावात राहिले तर गुप्त माहिती द्या. आम्ही माघारी आल्यानंतर कोणता नेता गावात राहिला याची माहिती द्या, त्यांना निवडणुकीत पाडलंच म्हणून समजा, असा इशारा जरांगे यांनी दिला.