श्रीवर्धन एसटी आगाराचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, नटबोल्ट निखळले; मुंबई-श्रीवर्धन लालपरीचा रामभरोसे प्रवास

श्रीवर्धन आगाराने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू केला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल येथून प्रवाशांना घेऊन सकाळी सहा वाजता सुटलेली (क्र.एम एच-13 सी यू 6896) मुंबई-नानवली-श्रीवर्धन या गाडीच्या मागील दोन चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे उजव्या बाजूच्या चाकाचे आठपैकी तब्बल पाच नट निखळलेले होते. उर्वरित तीन नटही ढिले असतानासुद्धा या गाडीने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनपर्यंत प्रवास केला आहे. सुदैवाने कोणताही अपघात झाला नसला तरी या रामभरोसे कारभाराने चाकरमान्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

मुंबई सेंट्रल येथून मुंबई-नानवली-श्रीवर्धन ही एसटी बस सुटते. या लालपरीने दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असतात. मात्र श्रीवर्धन आगारातील भंगार गाड्यांमुळे दिवसेंदिवस हा प्रवास धोकादायक होऊ लागला आहे. २८ जून रोजी सकाळी सहा वाजता खचाखच भरलेल्या प्रवाशांना घेऊन मुंबई-नानवली-श्रीवर्धन ही बस रायगडच्या दिशेने निघाली होती. मात्र या गाडीच्या मागील दोन चाकांना जोडणाऱ्या एक्सलचे उजव्या बाजूच्या चाकाचे आठपैकी पाच नट निखळलेले होते. उर्वरित तीन नट केव्हाही पडतील अशी अवस्था होती. मात्र असे असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतनपर्यंत गाडी आणण्यात आली.