पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी

पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यात सुरक्षा व्यवस्थेत चूक होती म्हणून झाला अशी कबुली जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. तसेच या सगळ्यासाठी मी जबाबदार आहे असेही सिन्हा म्हणाले. जम्मू कश्मीरच्या नायब राज्यपालपदी येऊन सिन्हा यांना पाच वर्ष पूर्ण केले. तेव्हा सिन्हा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही कबुली दिली आहे.

सिन्हा म्हणाले की, पाहलगाममध्ये जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. निष्पाप लोकांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. ही सुरक्षा यंत्रणांची चूक होती आणि त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. दहशतवादी पर्यटकांवर हल्ला करत नाही असा एक समज होता तो या हल्ल्यामुळे गैरसमज ठरला आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला ते एक खुले मैदान होते. त्या भागात सुरक्षा दलांना तैनात करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.

तसेच पहलगामध्ये झालेला हल्ला पाकिस्तानप्रायोजित दहशतवादी हल्ला होता. या प्रकरणात एनआयएने काही लोकांना अटक केली आहे. त्यातून या हल्ल्यात स्थानक लोकांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. परंतु असे असले तरीही जम्मू कश्मीरमधली सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.

या हल्ल्यामुळे देशात धार्मित तेढ निर्माण व्हावी आणि देशातल्या इतर भागात जम्मू आणि कश्मीरच्या लोकांबद्दर रोष निर्माण व्हावा असा पाकिस्तानचा हेतू होता असे सिन्हा म्हणाले. पाकिस्तानला जम्मू कश्मीरमध्ये शांतता आणि विकास नकोय. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था दुपटीने वाढली आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. हा हल्ला म्हणजे काश्मीरच्या आर्थिक प्रगतीवर पाकिस्तानने केलेला हल्ला आहे. परंतु या हल्ल्यानंतर काश्मीरी लोकांनी जोरदार निषेध आणि आंदोलनं केली. इथे कुठलाही दहशतवाद खपवणार नाही असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला गेला आहे असेही सिन्हा यांनी यावेळी नमूद केले.