शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हाताला लकवा मारलाय का? काँग्रेसचा सवाल

राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत, परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महायुती सरकारचा समाचार सपकाळ म्हणाले की, अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये बनवलेल्या व्हिडिओत सरोदे म्हणतात, “कर्जमाफी होऊन कर्जमुक्त होईल या आशेवर मी जगत होतो, या सरकारमध्ये गोरगरिब शेतकऱ्यांसाठी काहीच नाही म्हणून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली”. हे ऐकून मन सुन्न झाले पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, व अजित पवार यांना याचे काहीच वाटत नाही. आजही ‘योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी करु’, असे निर्लज्जपणे सांगितले जाते पण ही योग्यवेळ किती शेतक-यांचा बळी घेतल्यावर येणार आहे?

माजी कृषी सचिवांनी दिलेली घोटाळ्याची फाईल धनंजय मुंडेंनी हरवली!

बाबासाहेब सरोदे यांच्या सारखे शेतकरी दररोज जीवन संपवत आहेत, मायबाप सरकारच्या मदतीच्या आशेवर जगणारा गोरगरिब शेतकरी सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे निराश आणि हताश झाला आहे. शेतीसाठी लागणारे बी, बियाणे, खते, डिझेल भाजपा सरकारने महाग केले, शेतमालाला भाव नाही, निसर्गही साथ देत नाही. वर्षाला ६ हजार रुपये तोंडावर मारून शेतकऱ्यांसाठी खूप काही केले अशा गप्पा मारणारे हे भाजपा युतीचे सरकार फक्त मलई खाण्यात मग्न आहे. “शेतकऱ्यांनो, या निर्ढावलेल्या सरकारच्या भरवश्यावर राहू नका, आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबियांचा विचार करा”, असे कळकळीचे आवाहन सपकाळ यांनी केले.

कर्जमाफीच्या आशेवर जगलो, पण सरकारने साथ दिली नाही! फडणवीस, अजितदादांचे नाव घेत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या