
राज्यातील सिंचन घोटाळ्याचे अजित पवार हे खरे सूत्रधार होते. त्याचवेळी उच्चस्तरीय चौकशी नेमून त्यांच्यावर कारवाई केली असती तर ते तुरुंगात गेले असते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे पाप लपवले आणि त्याला पंतप्रधान मोदी यांनी पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांना केला आहे.
विजय पांढरे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत अजित पवार यांच्याविरोधात जलसंपदा घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसने त्यांची चौकशी लावण्याचा प्रयत्न केला तर सरकार पाडण्यात आले, असे विजय पांढरे यांनी म्हटले आहे.
माधवराव चितळे समितीने जलसिंचन घोटाळ्याच्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशा गोष्टी नमूद केल्या होत्या. चितळे यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, याप्रकरणात चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे. मात्र, सरकारने चितळे समितीचा अहवालही लपवून ठेवला. चितळे यांनी म्हटले होते की, मी दिलेल्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार जेलमध्ये जातील. मात्र, अजित पवारांचे जलसिंचन घोटाळे लपवण्याचे काम फडणवीस यांनी केले, यामध्ये शंका नाही, सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना पाठीशी घालणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, असेही विजय पांढरे यांनी म्हटले आहे.
अद्याप नागपूर खंडपीठाची क्लीन चिटला मान्यता नाही
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणात क्लीन चिट देण्याचे काम केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिल्याची लेखी माहिती नागपूर खंडपीठासमोर दिली. मात्र, अद्याप नागपूर खंडपीठाने ती क्लीन चिट मान्य केलेली नाही. सध्या या प्रकरणाची सुनावणी होत नाही ही खरी अडचण आहे, असे विजय पांढरे यांनी सांगितले.