मुद्दा – शिक्षक आणि एआय : शिक्षणाची दिशा कोण ठरवणार?

>> मच्छिंद्र ऐनापुरे

नव्या तंत्रज्ञानाचा उदय होताच नवनवी आव्हाने उभी राहतात. प्रिंटिंग प्रेस आला तेव्हा ‘पुस्तके असतील तर शिक्षकाची काय गरज?’ असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. रेडिओचा शोध लागला तेव्हा ‘ज्ञान घरबसल्या ऐकता येतंय, मग शाळेत जायचं कशाला?’ असा विचार झाला. दूरदर्शन आलं तेव्हा ‘जगातील श्रेष्ठ तज्ञांचे विचार सर्वांसाठी खुले झाले आहेत, मग शिक्षक नकोतच!’ अशी शंका उपस्थित झाली आणि आज इंटरनेट व त्यापुढे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आल्यावरही तोच प्रश्न पुन्हा ऐकू येतो – शिक्षकांची गरज आहे का?

अनेक एआय तज्ञच नव्हे, तर काही नामांकित शिक्षकसुद्धा याबाबत सावधगिरीचा इशारा देतात. लोकप्रिय शिक्षक आणि कोचिंग संस्थेचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी एका मुलाखतीत स्पष्टच म्हटलं-विद्यार्थ्यांना शिक्षक काय शिकवणार? त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एआय देतो आणि पुढे आणखी विश्वासार्ह पद्धतीने देईल. खरं सांगायचं तर एआय आल्यानंतर लगेच अशी भीती व्यक्त झाली नव्हती. पण जसजसा गुगल सर्च विश्वासार्ह ठरत गेला आणि त्यानंतर चॅटबॉट्सचा उदय झाला – ज्यांनी केवळ तथ्यात्मक उत्तरं न देता माणसांसारखा संवाद साधायला सुरुवात केली – तसतशी शिक्षक अप्रासंगिक ठरतील अशी भविष्यवाणी गती घेऊ लागली.

पण आपण लक्षात ठेवायला हवे की, शिक्षकाची भूमिका कधीच केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नव्हती. पुस्तके छापली गेली, रेडिओ-टीव्हीवर ज्ञानप्रसार सुरू झाला, इंटरनेट आलं, पण शिक्षकांची गरज कमी झाली नाही. उलट शिक्षण प्रक्रियेत त्यांचं स्थान अधिक मजबूत झालं. कारण शिक्षक फक्त माहिती देत नाही. तो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक असतो, त्यांना प्रेरणा देतो, त्यांच्या जीवनात मूल्यांची पायाभरणी करतो आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा संरक्षक बनतो. शिक्षक मशीन नाही. तो विद्यार्थ्यांना यांत्रिक पद्धतीने घडवत नाही. तो एका कलाकारासारखा भावनिक संवेदनांनी त्यांना घडवतो. हृदयाला भिडणारे प्रश्न विचारणे, जीवन बदलणारी प्रेरणा देणे हे फक्त शिक्षकालाच जमतं. म्हणूनच एआयच्या युगातही मानवी शिक्षक केवळ टिकून राहणार नाहीत, तर अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण एआय विद्यार्थ्यांना ‘काय’ आणि ‘कसे’ सांगतो, पण ‘का’ हे समजावून सांगण्याचं सामर्थ्य फक्त शिक्षकाकडे आहे.

 आज शिक्षणाचा उद्देश फक्त उत्तरं मिळवणं नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची, विश्लेषण करण्याची कौशल्यं विकसित करणं आहे. एआयकडे ही क्षमता मर्यादित आहे. कोणतेही मशीन विद्यार्थ्यांमध्ये मूल्यं रुजवू शकत नाही, सहानुभूती शिकवू शकत नाही, जबाबदारीची जाणीव निर्माण करू शकत नाही. आत्मविश्वास, संवाद कौशल्य, टीमवर्क, नेतृत्व ही सर्व गुणवैशिष्टय़ं जिवंत शिक्षकच विद्यार्थ्यांत विकसित करू शकतो. एआयने निर्माण केलेल्या आव्हानांशी सामना करण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला सिद्ध करायला हवं. आता फक्त पुस्तक वाचून दाखवणं पुरेसं राहिलेलं नाही. आज शिक्षकाने मेंटॉर म्हणून नवी भूमिका पार पाडायची आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायला हवं की, कोणती माहिती विश्वासार्ह आहे आणि कोणती भ्रामक?  उपलब्ध माहितीचा योग्य वापर कसा करायचा?  फक्त उत्तरं न घेता त्यामागचं तत्त्वज्ञान कसं समजून घ्यायचं? एआय कितीही बुद्धिमान झाला तरी त्याच्याकडे मानवी भावनिकता नाही. तो विद्यार्थ्यांच्या मनावर प्रभाव टाकू शकत नाही, त्यांना प्रोत्साहित करू शकत नाही. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात शिक्षक हीच खरी कसोटी आहे. कारण शिक्षण म्हणजे फक्त माहिती मिळवणं नव्हे; शिक्षण म्हणजे विचार शिकणं, मूल्यं आत्मसात करणं आणि व्यक्तिमत्त्व घडवणं. कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणाची प्रक्रिया नक्कीच अधिक कार्यक्षम, वेगवान आणि व्यापक करेल, पण ती शिक्षकाची भूमिका निभावू शकेल का? उत्तर स्पष्ट आहे – नाही. शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसतो. तो जीवनाचा शिल्पकार असतो. एआय माहिती देऊ शकतो, पण प्रेरणा, मार्गदर्शन, मूल्य संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास – ही शिक्षकाचीच अद्वितीय देणगी आहे. म्हणूनच एआयच्या प्रगत युगात शिक्षकांची भूमिका संपणार नाही. उलट ती अधिक महत्त्वपूर्ण होणार आहे.