
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 1 लाखांचे भांडवल असलेल्या अमिडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा जमीन व्यवहार फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्यूटीवर करण्यात आल्याचेही निदर्शनात आले.
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट करत याबाबत खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तहसिलदारांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचेही निर्देश दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मागवलेली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड या संदर्भातील सगळी माहिती मागवलेली असून योग्य ते चौकशीचे आदेश दिले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
प्राथमिक दृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊन बोलेन, असे फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. कुठेही अनियमितता झाली असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले.






























































