सामना अग्रलेख – काँग्रेसचे स्वबळ! मग इतरांचे काय?

गुंडगिरी, झुंडशाही, पैशांचा अतिरेकी वापर, पोलिसी बळाचा अतिरेक करून निवडणूक यंत्रणाचहायजॅककरण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे. अशा वेळी कोण कोणत्या विचारांचा हा डाव खेळता एकत्र येणे लढणे हाच मार्ग आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता, तेव्हा काँग्रेसने सबुरीने घ्यावे. पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही. काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतलाच तर तो त्यांचा निर्णय असेल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. राज ठाकरे यांच्या आगमनाने मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे. काँग्रेसने काय करायचे हा त्यांचा प्रश्न.

मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने केली. बिहारच्या निकालानंतर काँग्रेस पक्षात जो आत्मविश्वास निर्माण झाला त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. काँग्रेस हा एक स्वतंत्र पक्ष आहे. महाविकास आघाडीतला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा बाणा त्यांना अधूनमधून दाखवावा लागतो. मुंबई महापालिका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे. काँग्रेसचे म्हणणे असे की, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत आहेत. मनसे हा पक्ष इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत नसल्याने काँग्रेस राज ठाकरेंशी हातमिळवणी करू शकत नाही. राज ठाकरे सोबत आल्यास काँग्रेसला फटका बसेल असे काँग्रेसला वाटत आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना किंवा राज ठाकरे नव्हते. तरीही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याबाबत मुंबईकर काँग्रेसवाल्यांचे काय म्हणणे आहे? उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचे कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रीय प्रश्नांवर लढवल्या जात नाहीत. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर आहेच, पण देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईचे मराठीपण, मुंबईची ताकद कमी करण्यासाठी भाजप पुरस्कृत बिल्डर लॉबी शर्थीने कामाला लागली आहे. अशा वेळी मुंबईच्या रक्षणासाठी सगळ्य़ांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लढाई मुंबईची, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे हे निदान मराठी बाण्याच्या काँग्रेसवाल्यांनी लक्षात घेतले पाहिजे. काँग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी युती करण्याची भूमिका मांडली. आता हे समविचारी म्हणजे कोण? ज्यांना ज्यांना संविधान हाती घेऊन भाजपच्या भ्रष्ट, हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे ते आमच्या दृष्टीने समविचारी आहेत. काँग्रेसला मुंबईत भाजपचा व त्यांच्या अदानी संस्कृतीचा

पराभव करायचा आहे

की नाही? मुंबई काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड म्हणतात, ‘‘आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. काही पक्ष सातत्याने मारहाण करून कायदा हातात घेण्याची भाषा करतात. ती भाषा आमच्या संस्कृतीला शोभणारी नाही.’’ श्रीमती गायकवाड यांनी काँग्रेस संस्कृतीचा जो लेखाजोखा मांडला त्यात चुकीचे असे काहीच नाही, पण संविधानाची चिंता फक्त काँग्रेसला आहे व इतर पक्ष आड्याला तंगड्या लावून बसले आहेत असेही नाही. निवडणूक आयोगाने लोकशाही व संविधानाची हत्या केली. मतांच्या चोरीची प्रकरणे बाहेर पडली. याबाबत निवडणूक आयोगाकडे गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात, निवडणूक आयोगाविरुद्ध निघालेल्या प्रचंड मोर्चात राज ठाकरे यांचा सहभाग सक्रिय होता. स्वतः काँग्रेससह समस्त डावे-उजवे पक्षही या आंदोलनात सहभागी झाले होते. वास्तविक, डावे पक्ष याबाबत अधिक कडवट असतात, पण त्यांनीही राज ठाकरे व त्यांच्या पक्षाच्या सहभागाबाबत आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. मग मुंबईतील राष्ट्रीय काँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या मनात ‘स्वतंत्र’ विचार का यावेत? उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार आमच्यापासून दुरावतील, अशी भीती काँग्रेसला वाटते. लोकसभा आणि विधानसभेत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला मतदान केले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जात-धर्म न पाहता जी मदत केली, त्यामुळे मुस्लिमांचे मतदान शिवसेनेला झाले व काँग्रेसला कितीही भीती वाटली तरी हे मुस्लिमांचे मतदान शिवसेनेसह महाविकास आघाडीच्याच पारड्यात पडत राहील असा आत्मविश्वास आमच्या मनात पक्का आहे. काँग्रेसने मुंबईतील मुस्लिम, उत्तर भारतीयांची चिंता करू नये. मराठी म्हणून ते आपल्या पाठीशी ठाम उभेच राहतील. फक्त त्यांना आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. भाजपच्या झुंडशाहीच्या वरवंट्याखाली हा समाज रगडला जात आहे. धारावीतून ज्यांना विस्थापित व्हावे लागत आहे त्यात हिंदी भाषिक आणि मुसलमान आहेत, ते काय भाजपची पालखी वाहणार आहेत? अजिबात नाही. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यामुळे हा समाज शंभर टक्के काँगेसच्या पाठीशी जाईल हे

मनोरथ

कदापि पूर्ण होणार नाही. बरं, मुंबईत तुम्ही स्वतंत्र लढणार. मग इतर सत्तावीस महानगरपालिकांचे काय? तेथेही तुमची ‘एकला चलो रे’चीच भूमिका राहणार आहे काय? तसे दिसत नाही. शहाणपणा यातच आहे की, महाराष्ट्र धर्म म्हणून सर्व मराठी जनांनी एकत्र यावे व भाजपच्या अदानीशाहीविरुद्ध एल्गार पुकारावा. महाराष्ट्राचे हित त्यातच आहे. काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जो अवसानघात केला तो या वेळी करू नये. राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय विचार सध्या दिल्लीच्या खुंटीला टांगून ठेवा व मराठी बाण्याचे जे पक्ष एकत्र येत आहेत त्यांची गोळाबेरीज करून मुंबई महापालिकेवर मराठी माणसांचा भगवा कसा फडकेल, याचाच विचार करा. मराठी जनभावनेच्या विरोधात जाणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. भाजप व त्यांचे ‘बगलबच्चे’ कोणत्या स्तरावर जाऊन निवडणुकांचे खेळ खेळतात ते बिहारने पुन्हा एकदा दाखवून दिले. गुंडगिरी, झुंडशाही, पैशांचा अतिरेकी वापर, पोलिसी बळाचा अतिरेक करून निवडणूक यंत्रणाच ‘हायजॅक’ करण्याचा भाजपवाल्यांचा डाव मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे. अशा वेळी कोण कोणत्या विचारांचा हा डाव न खेळता एकत्र येणे व लढणे हाच मार्ग आहे. एकमेकांच्या संस्कृतीवर नंतर चर्चा करता येईल. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना धडा शिकवण्याची भाषा श्री. राहुल गांधी यांनी केलीच आहे. विरोधी पक्षांची आघाडी एकसंघ राहिली तरच तो धडा शिकवता येईल. राजकारणात प्रत्येक पक्ष आपली भूमिका घेऊन लढत असतो, हे खरे असले तरी महाविकास आघाडी म्हणून एकसमानता हवी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा एकोपा दिसला होता, तेव्हा काँग्रेसने सबुरीने घ्यावे. पळत्याच्या मागे लागून उपयोग नाही. काँग्रेसने स्वबळाचा निर्णय घेतलाच तर तो त्यांचा निर्णय असेल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. राज ठाकरे यांच्या आगमनाने मुंबईत मराठी एकजुटीला बळ मिळणारच आहे. काँग्रेसने काय करायचे हा त्यांचा प्रश्न.