
जालन्यातील भवानीनगरात गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा आज 22 नोव्हेंबर रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सागर भगवान आगलावे (18) जय भवानीनगर,जुना जालना असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील शनिवारी जालना शहरातील भवानीनगर भागात राहणाऱ्या सागर आगलावे यांना गाडी जाळण्याच्या संशयातून 2 ते 3 जणांनी रोडने बेदम मारहाण केली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचा सकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला आहे.































































